राज्यसभेतील निलंबित आठ खासदारांकडून संसद परिसरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या खासदारांनी काल रात्रभर हे आंदोलन सुरूच ठेवल्यानंतर आज सकाळी उपसभापती हरिवंश यांनी स्वतः या खासदरांना चहा दिला. उपसभापतींच्या कृतीबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे.

“ वैयक्तिकरित्या त्या लोकांना चहा देणं, ज्यांनी काही दिवस अगोदरच त्यांचा अपमान केला होता व जे धरणे आंदोलन करत आहेत. हे दिसते की हरिवंशजी किती विनम्र आणि मोठ्या मनाचे आहेत. यावरून त्यांच्या महानता दिसते. मी भारत्याच्या सर्व नागरिकांसह हरिवंशजी यांचे अभिनंदन करतो. अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं आहे.”

आणखी वाचा- राज्यसभेतील गोंधळामुळे उपसभापती हरिवंश यांचा एकदिवसीय उपोषणाचा निर्णय

कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित सर्व सत्रांसाठी सोमवारी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे राज्यसभेत सोमवारीही गदारोळ झाला. त्यामुळे कामकाजाविना सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर निलंबित खासदार संसदेच्या आवारात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत आहेत. रात्रभर आंदोलन करणार आणि निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करत राहणार, असं निलंबित खासदारांनी म्हटले आहे.