इतिहासातील यदुवंशीयांचे शौर्य आणि बलिदान पाहता भारतीय लष्करात 'अहिर रेजिमेंट' स्थापन झाली पाहिजे, असे मत काँग्रेसचे राज्यसभा खासदार दीपेंद्र सिंह हुडा यांनी व्यक्त केले. ही मागणी त्यांनी संसदेत मांडली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यदुवंशी समाजाची शौर्यगाथा समजून घेण्याची गरज आहे. राष्ट्राच्या रक्षणात ते कधीच मागे नव्हते. यासाठी त्यांनी अतुलनीय बलिदान दिले आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय सैन्यात एक अहिर रेजिमेंट असावी. सैन्यात आधीपासून अनेक जातीवर आधारित रेजिमेंट आहेत, त्यामुळे आणखी एक रेजिमेंट स्थापन करून काही फरक पडणार नाही. याचा सरकारने विचार करावा, असे सांगितले. अहिरवाल प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या दक्षिण हरियाणातील लोकानी नुकतेच गुरुग्राम येथील खेरकी दौला येथे भारतीय सैन्यात अहिर रेजिमेंट स्थापन करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली होती. केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग आणि गुरुग्रामचे खासदार यांनीही भारतीय सैन्यात 'अहिर रेजिमेंट' स्थापन करण्याच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. खेरकी दौला येथे ते म्हणाले की, “मी सैन्यात अहिर रेजिमेंटच्या मागणीला पूर्ण पाठिंबा देतो. या मागणीबाबत मी संरक्षणमंत्र्यांना (राजनाथ सिंह) पत्र लिहिले असून त्यांची भेटही घेतली आहे. मी भविष्यातही हा मुद्दा मांडत राहीन." मागणी पूर्ण करण्यासाठी दीर्घ लढा असेल, असे त्यांनी आंदोलकांना सांगितले. त्यांनी असेही अधोरेखित केले की सैन्यात अनेक जातींवर आधारित रेजिमेंट आहेत आणि आणखी एक जोडल्यास अडचण येणार नाही. ते म्हणाले, महेंद्रगड आणि रेवाडी (हरियाणा) येथील लोकच नव्हे तर उत्तर प्रदेशातील लोकही अहिर रेजिमेंटच्या स्थापनेची मागणी करत आहेत. या अगोदरही मी नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि भविष्यातही देत राहीन. याशिवाय इतरही अनेक संघटना आंदोलनात सहभागी आहेत. १८५७ च्या सैन्य विद्रोहानंतर ब्रिटीश सरकारने भारतीय सैन्यात जाती आणि प्रदेशांवर आधारित भरतीची योजना आखली होती आणि जोनाथन पील कमिशनला निष्ठावंत सैनिकांची भरती करण्यासाठी सामाजिक गट आणि प्रदेश ओळखण्याचे काम देण्यात आले होते.