ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि त्यांचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. दहशतवादी मसूद अजहरही या हल्ल्यात जखमी झाल्याची चर्चा आहे. तसंच अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येते आहे. लष्कराची पत्रकार परिषद झाल्यानंतरच याबाबतची माहिती समोर येईल. पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला ज्या दहशतवाद्यांनी केला होता त्यांना पाकिस्तानचं पाठबळ होतं. ज्यानंतर आता एअर स्ट्राईक करत पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने जोरदार उत्तर दिलं आहे.

पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात विनय नरवाल यांचा मृत्यू

पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. त्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. याच हल्ल्यात नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. आता ऑपरेशन सिंदूरनंतर विनय यांच्या आई आशा नरवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विनय नरवाल यांच्या आईने काय म्हटलं आहे?

एअर स्ट्राईक करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. माझा, माझ्या कुटुंबाचा आणि भारताच्या संपूर्ण जनतेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. लष्कराच्या जवानांना हेच सांगेन सज्ज होऊन असेच पुढे जा आणि असाच बदला घ्या. आपल्या लोकांवर हल्ला करण्याची कुणाचीही हिंमत व्हायला नको. आज मला आणि माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. पहलगामच्या हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला त्यांना आज न्याय मिळाला आहे. मी आज पहलगाममध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्या सगळ्यांनाच आदरांजली वाहते. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानते असं आशा नरवाल यांनी म्हटलं आहे. आशा नरवाल यांचा मुलगा आणि नौदल अधिकारी विनय नरवाल यांना २२ एप्रिलच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी ठार केलं. तसंच २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. आता भारताने ९ ठिकाणचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

कुठल्या ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक?

१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद

नऊ ठिकाणी हल्ला करुन पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान गर्भगळीत झाल्याचं चित्र आहे. आज मॉक ड्रीलची घोषणा देशभरात करण्यात आली होती. त्या रात्रीच १ वाजून ४४ मिनिटांनी भारताने लक्ष्यपूर्वक हल्ले करत पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केलं. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. रात्री १ वाजून ४४ वाजता हा स्ट्राईक करण्यात आला. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.