नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना नक्कीच न्याय मिळेल. २६ नागरिकांची नृशंस हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत तीव्र दु:ख आणि संताप व्यक्त करून मोदी म्हणाले, पहलगाम हल्ल्याची छायाचित्रे पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळत आहे. प्रत्येक भारतीयाला पीडित कुटुंबांबद्दल तीव्र सहानुभूती आहे, मग तो कोणत्याही राज्यातील असो किंवा कोणतीही भाषा बोलणारा असो. दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत देशातील १४० कोटी नागरिकांची एकता ही सर्वात मोठी ताकद असून ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आमच्या निर्णायक लढाईचा आधार आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागे असणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग भारताबरोबर उभे आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन शहरावरील हल्ला दहशतवादाच्या आश्रयदात्यांची निराशा आणि भ्याडपणा प्रतिबिंबित करतो, असे सांगत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचा संदर्भ दिला. काश्मीर खोऱ्यात शांतता, समृद्धी परतत आहे, शाळा व महाविद्यालयांत चैतन्य निर्माण होत आहे, बांधकामांना अभूतपूर्व गती मिळत आहे, पर्यटकांची संख्या विक्रमी दराने वाढत आहे, लोकशाही मजबूत होत आहे, तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होऊन जनतेचे उत्पन्न वाढत आहे… पण देशाच्या शत्रूंना, जम्मू-काश्मीरच्या शत्रूंना हे आवडले नाही. दहशतवादी आणि दहशतवादाचे सूत्रधार काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करू इच्छितात आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला, असे मोदी म्हणाले.

देशासमोरील दहशतवादाच्या आव्हानाला तोंड देण्याचा आपला निर्धार आपल्याला बळकट करायचा आहे. एक राष्ट्र म्हणून आपल्याला दृढ इच्छाशक्ती दाखवावी लागेल. आज जग पाहत आहे की या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका आवाजात बोलत आहे. या हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध होत आहे, आंतरराष्ट्रीय नेत्यांनी दूरध्वनी करून, पत्रे लिहून आणि संदेश पाठवून पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करून मृतांच्या कुटुंबीयांबाबत शोक व्यक्त केला, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताच्या अंतराळ मोहिमा सर्वाधिक किफायतशीर

भारत एक जागतिक अंतराळ शक्ती बनला आहे हे लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देश संपूर्ण जगातील सर्वात किफायतशीर परंतु यशस्वी अंतराळ कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहे आणि भविष्यात नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज आहे. अनेक तरुण अंतराळ नवउद्याोगाच्या क्षेत्रात नवीन टप्पे गाठत आहेत. दशकभरापूर्वी अंतराळ उद्याोगासंबंधी फक्त एकच कंपनी देशात होती आता त्यांची संख्या ३२५ हून अधिक झाली आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली. इस्राोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

सामाजिक कार्यकर्त्याची हत्या

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याची हत्या केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. कंदी खास येथे शनिवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी गुलाम रसूल मगरे यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मगरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांना मृत घोषित करण्यात आले.

आणखी तीन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील आणखी तीन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. हे दहशतवादी बांदीपुरा, पुलवामा आणि शोपिया या जिल्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे सांगण्यात आले. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात हाती घेतलेल्या कारवाईचा भाग म्हणून ही घरे पाडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर घरे पाडण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या एकूण नऊ झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काश्मीर खोऱ्यात शांतता, समृद्धी परतत आहे, लोकशाही मजबूत होत आहे. पण देशाच्या शत्रूंना हे आवडले नाही. दहशतवादी आणि दहशतवादाचे सूत्रधार काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करू इच्छितात आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. पहलगाममधील हल्ला दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांची निराशा आणि भ्याडपणा प्रतिबिंबित करतो. नरेंद्र मोदीपंतप्रधान