‘भारतात धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही असावी असे माझे मत आहे. पण घडून गेलेल्या एखाद्या घटनेबद्दल एखाद्या व्यक्तीला खरंच पश्चात्ताप होत असेल तर त्याला तशी दिलगीरी व्यक्त करण्याची संधी मिळायला हवी. एखाद्या व्यक्तीस ‘दंगली’च्या अध्यायातून बाहेर पडून नव्या उमेदीने पुढे जायचे असेल तर त्याला पुढे येवू द्यायला हवे.’ अशा शब्दांत इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी आपली भावना व्यक्त केली. एका वृत्तवाहनीवरील चर्चेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. जर ही संधी दिली गेली नाही तर वादग्रस्त दंगलींचे अध्याय हे कधीही न संपणारे प्रकरण ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला. गोध्रा जळीतकांडानंतर झालेल्या अहमदाबाद दंगली आणि त्याबद्दल नरेंद्र मोदी यांची दिलगीरी यांकडे या मुद्दय़ांचा रोख असला तरीही प्रत्यक्ष मोदी यांचे नाव घेण्याचे मात्र मूर्ती यांनी टाळले होते. मात्र सदर विधान मोदींबाबत आहे का, असे विचारले असता त्यांनी होकारार्थी मान हलवली. तसेच न्यायालयानेही मोदी यांना दंगलींशी संबंधित एकाही प्रकरणात दोषी ठरविलेले नाही वा त्यांच्यावर ठपकाही ठेवलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.