केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाण साधला आहे. शरद पवार यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याचे धाडस केल्याबद्दल नरेंद्र मोदींना भारतरत्त्न मिळायला हवा, असा खोचक टोला केजरीवाल यांनी ट्विटरवरून लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी बारामती येथे झालेल्या सभेत 'एनसीपी'चा उल्लेख 'नॅचरल करप्ट पार्टी' असा केला होता. याशिवाय, बारामतीकरांना काका-पुतण्यांची भ्रष्ट राजवट उलथवून टाकण्याचे आवाहनही केले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात आश्चर्यकारकरित्या मधूर संबंध तयार झाले होते. मोदी आणि पवार यांची ही मैत्री कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. याच मुद्द्यावर बोट ठेवत केजरीवाल यांनी गुरूवारी ट्विटरवरून मोदींना लक्ष्य केले. आपच्या अनेक नेत्यांनी आणि समर्थकांनीही केजरीवालांचा मुद्दा उचलून धरत मोदी सरकारचा दुटप्पीपणा उघड करणारे संदेश ट्विटस केले आहेत. देशातील भ्रष्टाचार निर्मुलन राजकारणासाठी खरतरं पवारांना पद्मविभूषण नव्हे तर भारतरत्न मिळायला हवा. #अबकी बार शरद पवार , असे खोचक ट्विट केजरीवालांनी रिट्विट केले आहे. ‘शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो’, असे जाहीरपणे सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्यासह इतर काही राजकीय गुरूंना, आध्यात्मिक गुरूंना मोठी गुरुदक्षिणा दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील नागरी पुरस्कारांत ‘भारतरत्न’पाठोपाठचे स्थान असलेला ‘पद्मविभूषण’ पुरस्कार शरद पवार यांना जाहीर झाला. केंद्रात मोदी यांचे सरकार आल्यानंतर मोदी यांच्या कामाची अनेकदा स्तुती करणारे, कधी त्यांच्यावर टीका करणारे, मात्र त्यांच्याशी उत्तम संबंध राखणारे अशी शरद पवार यांची प्रतिमा निर्माण झाली होती. मुरली मनोहर जोशी, पी. ए. संगमा (मरणोत्तर), सुंदरलाल पटवा (मरणोत्तर) हे राजकारणी या गौरवाचे मानकरी आहेत. त्याखेरीज प्रख्यात गायक येसूदास (कला-संगीत), सद्गुरू जग्गी वासुदेव आणि रत्नसुंदर महाराज (अध्यात्म), प्रा. उडिपी रामचंद्र राव (विज्ञान व अभियांत्रिकी) हे मान्यवरही ‘पद्मविभूषण’चे मानकरी ठरले आहेत.