पंजाबचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, अखेर संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला. यानंतर त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविषयी आता केलेलं विधान चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात खटके उडताना दिसत आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 18 सप्टेंबर रोजी सांगितले की, नवज्योतसिंग सिद्धू हे सक्षम नाहीत आणि पुढील मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाला आपण विरोध करु. अमरिंदर सिंह म्हणाले, “नवज्योतसिंग सिद्धू एक अक्षम माणूस आहे, तो एक आपत्ती ठरणार आहे. पुढील मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी मी त्यांच्या नावाला विरोध करीन. त्याचा पाकिस्तानशी संबंध आहे. हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असेल. ” याविषयी मनीकन्ट्रोल या वृत्त संकेतस्थळाने माहिती दिली आहे.

हेही वाचा – “…म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला”, कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सांगितलं कारण!

ते पुढे म्हणाले, “माझ्या देशासाठी, मी त्यांच्या (नवज्योत सिंग सिद्धू) पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला विरोध करणार आहे. ही राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांचे मित्र आहेत. सिद्धू यांचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी संबंध आहेत.
अमरिंदर यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर काही तासांतच हे विधान केलं आहे.

सिंह हे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि असे म्हटले की, त्यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केल्या जात असल्याने त्यांना अपमानित वाटले, म्हणून ते राजीनामा देत आहेत.