उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा एकत्र येण्यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर पर्यायी आघाडी उभी करण्यासंबंधी पुन्हा एकदा दिल्लीत चर्चा सुरु झाली असून यावेळी मोठी घडामोड समोर आली आहे. विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यातच आता शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्वावरुन वादंग सुरु असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुनही घमासान होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं म्हणणं आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखलं जाऊ शकतं असं या ठरावात म्हटलं आहे. "देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवं. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवं," असंही या ठरावात नमूद आहे. https://twitter.com/ravikantvarpe/status/1508747232249479171?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1508747232249479171%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Findia-news%2Fncp-youth-congress-proposes-to-make-sharad-pawar-president-of-upa%2Farticleshow%2F90523402.cms या ठरावानंतर आता काँग्रेस आणि युपीएतील घटक पक्ष काय भूमिका घेतात देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान या मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी जो तरुण विचारसरणी आणि संघटनेचा मुळ उद्देश पूर्णपणे समजून घेतो तो एक दिवस राजकारणात नक्की यशस्वी होतो असं शरद पवार यावेळी म्हणाले. "आपली विचारसरणी गांधी, नेहरु, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्या विचारसरणीपासून प्रेरित आहे. या सर्व लोकांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला," असंही शरद पवार म्हणाले. "स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरु, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाला एक नवी दिशा दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ विचारसरचणी एकच आहे, फक्त काम करण्याची पद्धत वेगळी आहे," असं शरद पवारांनी सांगितलं. "आज देशातील द्वेष आणि खोट्या राजकारणाच्या काळात तरुणांनी एकजूट होणं गरजेचं आहे. काश्मिरी पंडितांची मदत करण्याऐवजी त्याचा राजकीय फायदा घेणाऱ्या आणि सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करणाऱ्या सरकारविरोधात केवळ युवा शक्तीच सत्य आणि एकतेच्या आधारे सामना करु शकते," असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.