Nepal Bihar Flood Contaminated Fish Warning: नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे नेपाळसह उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार राज्यातही त्याचे पडसाद उमटत आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील नद्यांमध्ये नेपाळहून वाहून आलेले मृतदेह आढळले आहेत. तर बिहारमध्ये नेपाळमधील मासे पुरासह वाहत आले आहेत. हे मासे खाल्ल्यामुळे अनेकांना त्रास होत असल्याची बाब समोर आल्यानंतर आता बिहार सरकारने याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ३१ ऑगस्ट रोजी दुग्ध, मत्स्य आणि पशुधन विभागाने याबाबतची माहिती दिली.

बिहारच्या बागहा जिल्ह्यातील काही नागरिकांनी पुरात वाहून आलेले मासे खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर बागहाच्या उपविभागीय दंडाधिकारी चांदणी कुमारी यांनी नागरिकांना आवाहन करताना हे मासे खाऊ नयेत, असे म्हटले. नेपाळमधून पुराचे पाणी बिहारमधील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.

प्रभात खबरने याविषयी वृत्त दिले आहे. उपविभागीय दंडाधिकारी चांदणी कुमारी यांनी प्रभात खबरशी बोलताना सांगितले की, नेपाळमधील पुराच्या पाण्यासह बिहारच्या काही नद्यांमध्ये अज्ञात आणि वेगळ्याच प्रकारचे मासे येत असल्याची माहिती मिळाली. हे मासे खाल्ल्यानंतर काही नागरिक आजारी पडल्याचीही बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगायला हवी.

प्रशासनाच्या माहितीनुसार, पूर आल्यानंतर तलाव, नदी, सरोवर आणि इतर जलाशयात पाण्याच्या प्रवाहाबरोबर मासे दूरपर्यंत जातात. पुरामुळे पाण्यात कचरा, मृत जनावरे आणि इतर दूषित घटकही मिसळतात. घाणेरड्या पाण्यामुळे जीवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य संसर्गामुळे मासे दूषित होऊ शकतात. अशावेळी पुराच्या पाण्यातील मासे पकडून त्याचे सेवन केल्यास त्रास होऊ शकतो, असाही इशारा प्रशासनाने दिला आहे.

असे मासे खाण्याचे धोके काय आहेत?

प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, जर कुणी असे मासे खाल्ल्यानंतर त्यांना उलटी, अतिसार, पोटात दुखणे, चक्कर येणे किंवा श्वसनाचा त्रास असे कोणतेही असामान्य लक्षण दिसले तर त्यांनी तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल व्हावे.

दुग्ध, मत्स्य आणि पशुधन विभागाने म्हटले आहे की, पाण्याची पातळी सामान्य होईपर्यंत किंवा परिस्थिती स्थिर होईपर्यंत पुराच्या पाण्यातून आलेले मासे खाऊ नयेत. तसेच अपरिचित मासे आढळल्यास लोकांनी स्वतःहून त्याची माहिती जिल्हा मत्स्य अधिकाऱ्यांना द्यावी, असेही सुचवले आहे.

सोशल मीडियावह व्हिडीओ व्हायरल

बिहारच्या नद्यांमध्ये वाहून आलेले मासे लोक पकडून घेऊन जातानाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एक्सवरील एका युझरने दावा केला की, हे मासे स्मशानघाटाशेजारी असलेल्या नदीत वाढतात. अर्धवट जळालेले प्रेत खात असल्यामुळे हे मासे एवढे मोठे होतात. या माशांना आळशी मासे असेही म्हटले जाते. हे मासे अपवित्र असून त्याला कुणीही खाऊ नये, असे या युझरने म्हटले.