नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मोठा हाहाकार उडाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेले अनेक भारतीय भाविक बेपत्ता झाले असून, यामध्ये तब्बल ३० वर्षांपेक्षा जास्त काळ हिमालयात भ्रमंती करणारे मुंबईतील ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश आहे. नेपाळ प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर सुमारे १७८ भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. द इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

डॉ. मिलिंद चितळे यांनी वैद्यकीय शिक्षण (MBBS) पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय व्यवसाय बाजूला ठेवून गिर्यारोहणाला आपले आयुष्य समर्पित केले होते. मुंबईतील ‘हिल्स अँड ट्रेल’ (Hills and Trails) या त्यांच्या ट्रेकिंग संस्थेच्या माध्यमातून सुमारे ४० भाविकांचा समूह कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेला होता. या गटामध्ये डॉ. चितळे, त्यांच्या पत्नी जान्हवी चितळे आणि मुंबईतील अनेक नामांकित नागरिक सहभागी होते. महापुरानंतर या संपूर्ण समूहाशी असलेला संपर्क तुटला आहे.

मुंबईतील नामांकित डॉक्टर आणि ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

बेपत्ता असलेल्या भाविकांमध्ये मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गायत्री देशपांडे आणि त्यांचे पती तसेच हिंदुजा रुग्णालयातील रक्तशास्त्र (Hematology) विभागाचे प्रमुख डॉ. आनंद देशपांडे यांचा समावेश आहे. याशिवाय नागपूरचे ६८ वर्षीय सुनील सुभेदार आणि ६४ वर्षीय चेतना गुप्ता यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही या गटात समावेश आहे.

डॉ. देशपांडे दांपत्याची भाची मैथिली मुंदडे यांनी सांगितले, “रविवारनंतर आमचा त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. आम्ही सतत फोन लावण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु संपर्क होऊ शकत नाहीये. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो, त्याच्याशीही बोलणे होऊ शकलेले नाही.”

प्रवासाची आवड अन् ३ हजार ट्रेक्सचा अनुभव

डॉ. मिलिंद चितळे (वय ६० हून अधिक) यांनी १९८३ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले होते. मात्र, निसर्ग आणि गिर्यारोहणाच्या आवडीमुळे त्यांनी १९९७ मध्ये ‘हिल्स अँड ट्रेल’ची स्थापना केली. त्यांनी हिमालयात ३,००० हून अधिक ट्रेक्स आणि मोहिमा पूर्ण केल्या असून कांचनजंगा पर्वतावर २३,००० फुटांपर्यंत चढाई केली आहे. पर्वत बचाव तंत्र आणि प्रथमोपचारावर त्यांनी पुस्तकही लिहिले असून २००५ मध्ये त्यांना ‘गिरिमित्र पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी आतापर्यंत २५ हून अधिक वेळा कैलास-मानसरोवर यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

कुटुंबीयांची चिंता वाढली; शोधमोहीम सुरू…

नागपूरचे सुनील सुभेदार यांचे सुपुत्र स्वानंद सुभेदार यांनी सांगितले की, “२६ ऑगस्ट रोजी वडिलांशी शेवटचे बोलणे झाले होते. ते तिमुरे (Timure) येथे होते आणि चीनच्या सीमेकडे जाण्याच्या तयारीत होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद येत आहे.”

तर दुसरीकडे, बेपत्ता असलेल्या चेतना गुप्ता यांचे पती आनंद गुप्ता यांनी सांगितले की, “इमिग्रेशन सेंटरजवळ असताना चेतनाशी संवाद झाला होता. एका सहप्रवाशाचा पासपोर्ट काठमांडूमध्ये राहिल्यामुळे ते सर्वजण थांबले होते. त्यानंतर संपर्क तुटला.” सध्या गुप्ता कुटुंबातील तीन सदस्य माहिती घेण्यासाठी काठमांडूमध्ये दाखल झाले आहेत.

नेपाळमधील स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य राबवत आहेत. भारतीय दूतावास देखील नेपाळ सरकारचे सतत संपर्कात असून बेपत्ता भारतीयांचा शोध घेण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.