मुखपट्टी वापरण्याचे आवाहन पीटीआय, नवी दिल्ली : देशभर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून फ्लूसदृश लक्षणे असलेल्या आजाराची साथ पसरली असून हा फ्लूचाच एक प्रकार असल्याचे आणि ‘फ्लू ए’चा उपप्रकार ‘एच३एन२’ या विषाणूमुळे त्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. सतत खोकला आणि कधी कधी त्याच्या जोडीला ताप ही या आजाराची लक्षणे आहेत. फ्लूच्या इतर उपप्रकारांपेक्षा ‘एच३एन२’मुळे रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्दी, खोकला आणि तापाबरोबरच मळमळ, उलटय़ा, घसादुखी, अंगदुखी, अतिसार ही या आजाराची अन्य लक्षणे आहेत. त्यावर उपचार करताना सरसकट प्रतिजैवकांचा वापर करू नये आणि डॉक्टरांनी सध्या फक्त लक्षणांवर औषधे द्यावीत असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिला आहे. हा हंगामी ताप पाच ते सात दिवस येतो, असेही ‘आयएमए’ने स्पष्ट केले. हा ताप तीन दिवसांनी जातो, तर खोकला मात्र तीन आठवडय़ांपर्यंत राहू शकतो, असे ‘आयएमए’च्या समितीने सांगितले. या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत: हवेतून होत आहे. १५ पेक्षा कमी आणि ५०हून अधिक वयाच्या रुग्णांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक आहे. विषाणूचा संसर्ग श्वासनलिकेच्या वरील भागाला होतो आणि ताप येतो, असा निष्कर्ष १५ डिसेंबरपासून करण्यात आलेल्या पाहणीवरून काढण्यात आला आहे. हा आजार जीवघेणा नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले असले तरी काही रुग्णांच्या बाबतीत श्वसनयंत्रणेला संसर्ग होत असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागूू शकते. काय करू नये? - हस्तांदोलन करू नये, स्पर्श टाळावा. - सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. - स्वत:हून औषधे घेऊ नयेत. - डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रतिजैवके आणि इतर औषधे घ्यावीत. - इतरांच्या अगदी जवळ बसून खाणे टाळावे लक्षणे काय? सर्दी, खोकला आणि कधी कधी जोडीला ताप. तापाबरोबरच मळमळ, उलटय़ा, घसादुखी, अंगदुखी, अतिसार. ताप तीन दिवसांनी जातो, तर खोकला तीन आठवडय़ांपर्यंत राहू शकतो. काय करावे? हात नियमितपणे साबण आणि पाण्याने धुवावेत. मुखपट्टीचा वापर करावा, गर्दीची ठिकाणे टाळावीत. नाक आणि तोंडाला हात लावणे टाळावे. खोकताना, शिंकताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाकावे. पाणी पीत राहावे, भरपूर द्रवपदार्थाचे सेवन करावे. ताप आणि अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घ्यावी. प्रतिजैविके का टाळावीत ? कोणतीही खबरदारी न घेता ‘अॅझिथ्रोमायसिन’ आणि ‘अमॉक्सिक्लाव्ह’सारखी प्रतिजैविके घेतली जातात आणि बरे वाटायला लागले की त्यांचा वापर थांबवला जातो. यामुळे विषाणूंमध्ये या प्रतिजैवकांबद्दल प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि खरोखर गरज असते तेव्हा ती प्रभावी ठरत नाहीत. अमॉक्सिसिलिन, नॉरफ्लॉक्सेसिन, ऑप्रोफ्लॉक्सेसिन आणि लेव्होफ्लॉक्सेसिन या प्रतिजैविकांचा सर्वाधिक गैरवापर होतो. अतिसार आणि मूत्रमार्गाला होणाऱ्या संसर्गासाठी ती घेतली जातात.