तुमच्या वाहन परवान्याची वैधता संपली असेल तर ववर्षभराच्या आत तातडीने नूतनीकरण करा. वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) कालबाह्य झाल्यानंतर वर्षभराच्या आत परवान्याचं नुतनीकरण न केल्यास तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल. कारण, महाराष्ट्रात वाहन परवान्याबाबत मोटार वाहन (दुरुस्ती) कायद्यांतर्गत नवीन नियम लागू करण्यात आला आहे. यानुसार, वाहन परवाना एका वर्षापेक्षा अधिक कालबाह्य झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लर्निंग (प्रशिक्षणार्थी) परवान्यासाठी अर्ज करावा लागेल. म्हणजेच तुम्हाला पुन्हा एकदा लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर कायम परवान्यासाठी 30 दिवस अर्थात एक महिना प्रतीक्षा करावी लागेल. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, "आम्ही सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत काम करण्यास बांधील आहोत. महाराष्ट्राने राज्यातील सर्व 50 आरटीओमध्ये हा नवीन नियम लागू केला आहे", असं याबाबत बोलताना आरटीओ अधिकारी अभय देशपांडे म्हणाले. तसंच, यापुढे परवाना संपलेल्या व नूतनीकरणासाठी येणाऱ्या अर्जांवर यापुढे विशेष ट्रीटमेंट केली जाणार नाही. त्यांना लर्निंग लायसन्सच्या अर्जांप्रमाणेच वागणूक दिली जाईल. याशिवाय कायम परवान्यासाठी एक महिन्याच्या प्रतीक्षेतही सूट मिळणार नाही असंही देशपांडे यांनी स्पष्ट केलंय. "गेल्या 15 वर्षांपासून सर्व नियमांचं पालन करुन मी गाडी चालवतोय. आतापर्यंत एकदाही माझ्यावर दंडात्मक कारवाई झाली नाही. पण, आता मला नवीन अर्जदार म्हणून वगणूक दिली जातेय अशी प्रतिक्रिया वर्षभरापूर्वीच परवाना संपलेल्या दिपक कुलकर्णींनी दिली. नव्या नियमांनुसार, परवान्यासाठी तुम्हाला आता पुन्हा सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. बायोमेट्रिक करावे लागेल आणि लर्निंग टेस्टदेखील द्यावी लागेल. अनेक लोकांना अद्याप नवे नियम माहित नाहीत, ते नव्या नियमांबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूलचालकांना नव्या नियमांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आलेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. आता नव्या नियमांनुसार, मूळ स्थानाचे रहिवासी प्रमाणपत्र आणि आधार कार्ड प्रत जमा करुन तुम्ही महाराष्ट्रात कुठूनही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकतात. अशाचप्रकारे, जर तुम्ही मुंबईत कार बुक केली असेल तर तुम्ही तुमच्या पत्त्याचा( होम टाऊन) पुरावा देऊन शहर आरटीओमध्ये नोंदणी करू शकतात.