पंजाब नॅशनल बॅंकेत १३,५०० कोटींचा घोटाळा करून फरार झालेला नीरव मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. नीरव मोदीच्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. तसेच, त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यातच आता मला भारतात पाठवलं तर, आपली हत्या होईल. अथवा तुरुगांत आपण आत्महत्या करू, असे नीरव मोदीने म्हटलं आहे.

भारतात करण्यात येणाऱ्या प्रत्यर्पणाविरोधात नीरव मोदीने लंडन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी पार पडली. यावेळी नीरव मोदीचे मानसोपचारतज्ज्ञ प्राचार्य अँड्र्यू फॉरेस्टर यांनी सांगितलं की, नीरव मोदीला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. मात्र, या कारागृहात यापूर्वीही अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.

हेही वाचा – मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा खुलासा, म्हणाले “माझं नाव सोनिया गांधींनी…”

नीरवचे भारतात प्रत्यार्पण केल्यास तो आत्महत्या करण्याचा विचार करतो आहे. भारतातील कारागृहात त्याची हत्या होण्याची भितीही त्याला आहे. त्याचा मानसिक आजार वाढला असून, त्यासाठी दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. नीरवच्या आईनेही आत्महत्या केली होती. त्यामुळे तो नैराश्यात गेला आहे, असे फॉरेस्टर यांनी न्यायालयाला सांगितलं.

हेही वाचा – अपघातानंतर तरुण बसखाली गेला आणि आगीत होरपळू लागला, पोलीस मात्र जीव वाचवत पळाले

तर, भारताची बाजू मांडताना हेलन माल्कम केसी यांनी म्हटलं, भारतात नीरव मोदीचा खाजगी मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार करण्यात येईल. त्याच्यासह आणखी एका कैद्याला राहण्याची परवानगी असेल. तसेच, त्याच्या वकिलाला दररोज तर आठवड्यातून एकदा कुटुंबाला भेटण्याची परवानगी असेल. नीरव मोदीला ठेवण्यात येणाऱ्या कारागृहात पंखे, वीजेची ठिकाणं काढून टाकण्यात येतील. तसेच, कारागृहात एका खिडकी काढली जाईल. त्यामाध्यमातून त्याच्यावर नजर ठेवण्यात येईल.