कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याविरोधात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य हे अधिक प्रक्षोभक होते व जर मोदी भारताचे पंतप्रधान झाले तर प्रादेशिक शांतता धोक्यात येईल, असे मत पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री चौधरी निसार अली खान यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, मोदी यांनी पहिल्यांदा दाऊद कोठे आहे हे ठरवावे. सत्तेवर आल्यास दाऊदला भारतात आणू असे वक्तव्य मोदी यांनी केले होते, त्यावर खान म्हणाले की, मोदींचे वक्तव्य प्रक्षोभक व निषेधार्ह आहे. एका मोठय़ा राजकीय पक्षाच्या नेत्याने पाकिस्तानविरोधी शत्रुत्वाची सीमा गाठणे बरोबर नाही.
खान म्हणाले की, पाकिस्तानने दाऊदला आसरा दिला आहे व पाकिस्तानी भूमीवर कारवाईची भाषा करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे की, पाकिस्तान अशा धमक्यांना घाबरण्याइतका कमकुवत नाही व अशा बेजबाबदार विधानांनी आमच्यावर काही परिणाम होणार नाही.
 मोदी यांनी अलीकडेच गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर दाऊद इब्राहिमला पकडून आणण्यात कुचराई केल्याचा आरोपही केला होता. भारत दाऊदला पाकिस्तानातून पकडून आणेल या शिंदे यांच्या विधानावर मोदी असे बोलले होते की, अशा गोष्टी प्रसारमाध्यमांमार्फत होत असतात का, अशा गोष्टी वर्तमानपत्रात उघड करणे योग्य असते का, अमेरिकी लोकांनी बिन लादेनला ठार मारताना वाच्यता केली होती का, त्याबाबतच्या योजनेवर पत्रकार परिषद घेतली होती का. सरकारने आतापर्यंत काय केल़े? त्यांना साधी परिपक्वता नाही, गृहमंत्री अशी विधाने करतात याची आपल्याला लाज वाटते. दाऊद इब्राहिम हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानात पळाला आहे. त्याला भारताच्या ताब्यात द्यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण पाकिस्तान त्याला ताब्यात द्यायला तयार नाही.