विविध मंत्रालयांच्या सहभागाने यमुना नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या उपाययोजना आखण्याबाबत सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याशी चर्चा केली.भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि नौवहन, जलसंसाधन आणि पर्यावरण व वन विभाग यांच्यासह दिल्ली सरकारमधील संबंधित विभागांच्या सहकार्याने यमुना नदी शुद्धीकरण प्रकल्प कसा राबविता येईल, याबाबत गडकरी यांनी जंग यांच्याशी चर्चा केली. यासाठी भूवाहतूक, महामार्ग आणि नौवहन मंत्रालयात विशिष्ट कक्ष स्थापन केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याबद्दलही या वेळी चिंता व्यक्त करण्यात आली. वाहतुकीच्या नियमांचे एखाद्याने सातत्याने उल्लंघन केल्यास त्याचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द केला जाईल, असे गडकरी यांनी जाहीर केले होते.