गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील नवादा येथे जनतेला संबोधित केलं. तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर शाह यांनी टीकास्र डागलं आहे. नितीश कुमार पंतप्रधान होता होता राहिले. कारण, देशातील जनतेने ठरवलंय, की तिसऱ्यांदाही नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर येथील सरकार आपल्याच वजनाने पडेल. त्यानंतर कमळाचं सरकार स्थापन होईल. लोकसभेला ४० च्या ४० जागांवर उमेदवार निवडून द्या. दंगल करणाऱ्यांना उलटे टांगून सरळ करू, असेही अमित शाह यांनी सांगितलं आहे.
“बिहारच्या जनतेनं ठरलंय की, लोकसभेच्या ४० ही जागांवर मोदींचं कमळ फुलणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि जनता दल यूनाइटेड ( जेडीयू ) परत एनडीएमध्ये येईल. तर आताच स्पष्ट करतो की, भाजपाचे दरवाजे जेडीयूसाठी कायमचे बंद झालेत,” असा अमित शाह यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : काँग्रेसच्या कार्यकाळात ४८,२०,६९,००,००,०० रुपयांचा घोटाळा, भाजपाचा VIDEO ट्वीट करत धक्कादायक आरोप
“लोकसभा निवडणुकीनंतर सरकार पडणार”
अमित शाह यांनी बिहारमधील जेडीयू आणि आरजेडी या महागठबंधन सरकारला लक्ष्य केलं. “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर बिहार सरकार पडणार असून, भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. ज्या सरकारबरोबर जंगलराजच्या लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आहे, ते सरकार बिहारमध्ये शांती बनवू शकेल का? सत्तेच्या हव्यासापोटी नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. पण, महागठबंधनचे हे सरकार आम्ही उखडून टाकू,” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
“काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, टीएमसी, डीएमके हे सर्व पक्ष राममंदिराला विरोध करत होते. पण, पंतप्रधान मोदींनी राम मंदिराचं भूमिपूजन केलं आणि बांधकामाला सुरूवात झाली,” असं अमति शाह म्हणाले.