पक्षाच्या इच्छेविरोधात विखे तसेच राणे पुत्रे रिंगणात उतरुनही कारवाई अवघड

लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन बडय़ा नेत्यांच्या मुलांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मुलांच्या बंडानंतर या दोन्ही नेत्यांबाबत त्यांच्या पक्षांनी बघ्याचीच भूमिका घेतली आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते अहमदनगर मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. वडिल काँग्रेसचे नेते आणि पूत्र भाजपचे उमेदवार असे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे राज्यसभेत भाजपचे खासदार असून, त्यांचे पूत्र निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या विरोधात रिंगणात आहेत. राणे हे युतीचे खासदार आणि त्यांचे पूत्र युती उमेदवाराच्या विरोधात, असे चित्र आहे.

विखे-पाटील यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला तरी काँग्रेसने विखे-पाटील यांच्या विरोधात कारवाईबाबत कोणतेच पाऊल उचललेले नाही. पक्षाने त्यांना साधी नोटीसही बजाविलेली नाही. मुलाच्या बंडानंतर काँग्रेसने विखे-पाटील यांना अडगळीत टाकले आहे. शिर्डी मतदारसंघात त्यांना पक्षाच्या वतीने बैठकांसाठी निमंत्रित केले जात नाही. काँग्रेसमध्ये एकटे पडल्यानेच विखे-पाटील हे सुद्धा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगरमध्ये होणाऱ्या जाहीर सभेच्या वेळी विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांच्या पूत्राने उमेदवारी दाखल करू नये, अशी आधी भाजपची भूमिका होती. राणे यांना तसे सूचित करण्यात आले होते. पण कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, असे राणे यांनी भाजप नेत्यांना कळविले होते. निलेश राणे यांच्या उमेदवारीचे समर्थन करून भाजपचे खासदार असलेल्या राणे यांनी युती धर्माला हरताळ फासला आहे.

राणे यांच्या पूत्राने माघार घ्यावी म्हणून भाजपकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. शिवसेनेनेही राणे पूत्राच्या उमेदवारीचा विषय फारसा प्रतिष्ठेचा केला नाही. निलेश राणे हे रिंगणात राहिल्याने आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.

निलेश राणे रिंगणात

माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे राज्यसभेत भाजपचे खासदार असले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात त्यांचे पूत्र निलेश राणे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. राणे यांच्या पूत्राने माघार घ्यावी म्हणून भाजपकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत की राणे यांनी दबावाला महत्त्व दिले नाही याबाबत जिल्ह्य़ात वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

रत्नगिरी-सिंधुदुर्ग  मतदारसंघात  एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी भाजपा-सेना युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांच्यातच मुख्य सामना रंगणार आहे. नारायण राणे यांच्या पूत्राने उमेदवारी अर्ज दाखल करू नये म्हणून भाजप नेत्यांनी आधी राणे यांच्यावर दबाव आणला होता. पण आपल्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही, असे राणे यांनी जाहीर केले होते. राणे यांचे पूत्र किंवा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला तरी केंद्रात भाजपलाच पाठिंबा मिळणार आहे. राणे माघार घेणार नाहीत हे लक्षात येताच भाजपने प्रयत्न सोडून दिले.