श्रीनगर : ‘‘काश्मीरच्या तीन जिल्ह्यांत सध्या एकही स्थानिक दहशतवादी उरलेला नाही. लष्कर-ए-तैय्यबा, जैश-ए-मोहम्मद यांच्या अनेक म्होरक्यांचा आणि कमांडरचा सुरक्षा दलांनी आपल्या मोहिमेत खात्मा केल्याने या दहशतवादी संघटनाही सध्या नेतृत्वहीन झाल्या आहेत,’’ अशी माहिती काश्मीर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजयकुमार यांनी दिली. बांदिपोरा, कूपवाडा आणि गंदरबल हे सध्या ‘स्थानिक दहशतवादी मुक्त’ जिल्हे आहेत. मात्र, बादिपोरा, कूपवाडा येथे सध्या सात विदेशी दहशतवादी सक्रिय आहेत. येथे दौऱ्यावर असलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना विजयकुमार म्हणाले, की काश्मीरमध्ये १३ जिल्ह्यांत सध्या ८१ दहशतवादी असून, यापैकी २९ दहशतवादी स्थानिक आणि ५२ दहशतवादी पाकिस्तानी आहेत, अशी माहिती देऊन विजयकुमार यांनी सांगितले, की स्थानिक नागरिक दहशतवादी संघटनांत सामील होण्याचे प्रमाणही गेल्या सात वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी आणि दहशतवादाशी संघर्षांत सुरक्षा दले सध्या वरचढ ठरली आहेत. आगामी काळात सक्रिय स्थानिक, विदेशी आणि काही काळ दहशतवादी कारवाया करून एरवी सामान्य नागरिक म्हणून जीवन जगणारे (हायब्रिड) दहशतवाद्यांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आणण्याची आमची योजना आहे. पुढील दोन वर्षांत काश्मीरमधून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करू, असा आम्हाला विश्वास वाटतो. त्यांनी सांगितले की, २०१५ पासून फारूक नल्ली हा हिजबुल मुजाहिदिन दहशतवादी संघटनेचा एकमेव कुख्यात कमांडर सक्रिय आहे. त्याच्यावर लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस अशा सर्वच सुरक्षा दलांचे बारकाईने लक्ष आहे. दोन वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये ८० कुख्यात दहशतवादी कमांडर होते. आता फक्त तीन जण अस्तित्वात आहे. त्यातील फक्त नल्ली हाच सक्रिय आहे. बाकी दोन जण सध्या सक्रिय नाहीत. यावरून दहशतवादी संघटनांची म्होरक्यांचा खात्मा करण्यास सुरक्षादलांना मिळालेले भरीव यश आपल्या लक्षात येईल. सध्या येथे १५ ते १८ ‘हायब्रिड’ दहशतवादी सक्रिय आहेत.