सांबा, जम्मू : जम्मूतील एका वर्दळीच्या भागात दुहेरी बॉम्बस्फोटात नऊ जण जखमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, सध्या जम्मू- काश्मीरमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. गुरुवारी पंजाबमार्गे कथुआ जिल्ह्यात शिरलेली ही यात्रा विश्रामानंतर रविवारी हिरानगर येथून पुन्हा सुरू झाली असून, २३ जानेवारीला जम्मू येथे पोहोचेल. पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार, राहुल गांधी हे जम्मू- काश्मीरच्या लोकांसमवेत बनिहाल येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची शक्यता आहे. बनिहाल हे जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काश्मीरसाठीचे प्रवेशद्वार असलेले शहर आहे. रमेश म्हणाले की, दहशतवादाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट असून, दहशतवादाचे गुन्हेगार किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांशी वागताना कुठलीही तडजोड केली जाऊ शकत नाही. ‘गांधी यांच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड होणार नाही. त्यांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, सुरक्षा यंत्रणांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आम्ही संपूर्णपणे पालन करत आहोत’, असे सांबातील चक नानक येथे रमेश यांनी सांगितले.