इतर पेशातील लोकांप्रमाणेच कलाकारांनाही त्यांच्या मनातील गोष्टी बोलून दाखवण्याचे स्वातंत्र्य आहे, असे मत अभिनेता शाहरूख खान याने व्यक्त केले. गेल्या काही दिवसांत अभिनेता आमीर खानच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादंगाबाबत विचारले असता शाहरूखने हे उत्तर दिले. त्यावेळी काही गोष्टींबाबत बोलणे महत्त्वाचे होते. माझ्या मते कलाकार किंवा इतर पेशातील लोकांनी त्यांना वाटत असलेल्या गोष्टींबाबत बोलण्यात काहीही वावगे नाही. आपण गोष्टींबाबत बोलले पाहिजे, बोलणे ही चांगली गोष्ट असून या माध्यमातून प्रश्न सोडवले पाहिजेत, असे शाहरूखने ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही काही बोलू शकता, अन्य कोणी त्याच्याविरोधात बोलू शकते आणि तुम्ही चर्चा करू शकता. ज्या गोष्टींबद्दल बोलले जाते त्यांच्याकडे पठडीबाज दृष्टीकोनातून बघण्यापेक्षा त्याकडे चर्चेचे एक माध्यम म्हणून बघावे. एखादा निर्णय घेण्यासाठी, टर उडविण्यासाठी किंवा अंतिम प्रतिक्रिया देण्याच्यादृष्टीने त्याकडे बघू नये, असे शाहरूखने यावेळी सांगितले.
गेल्याच महिन्यात एका मुलाखतीदरम्यान भारतातील असहिष्णुतेसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे समाज माध्यमांवरून शाहरूख खानवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. याविषयी विचारले असता शाहरूख म्हणाला की, समाज माध्यमे ही चर्चा करण्यासाठी आहेत, सगळ्या गोष्टींचा शेवट करण्यासाठी नव्हेत. प्रत्येक गोष्ट अंतिम सत्य मानून चालण्याची गरज नाही. समाज माध्यमांचा उद्देश हा चर्चा करणे आहे, बेजाबाबदार विधाने करणे नव्हे. ज्याक्षणी तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल तेव्हा मुर्ख लोकांच्या विधानांकडे दुर्लक्ष करायला शिकाल, असे शाहरूखने म्हटले.
शाहरूख खान सध्या ‘दिलवाले’ या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबर लंडनमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. येत्या १८ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.