साठेबाजी करणाऱ्यांमुळे अन्नपदार्थाची भाववाढ झाली असा आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला असून यामुळे घाबरण्याचे कारण नाही. राज्ये साठेबाज व काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करतील व त्यामुळे भाववाढ आटोक्यात येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
अन्न भाववाढीवरील परिषदेत  त्यांनी सांगितले, की अन्नधान्य उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त असताना किमती वाढतच आहेत याचा अर्थ मधले लोक साठेबाजी करीत आहेत असा होतो. किमती काबूत आणण्यासाठी साठेबाजी रोखणे आवश्यक आहे. काही अन्नपदार्थाच्या किमती जुलै ते डिसेंबर दरम्यान वाढतात, कारण त्यांची साठेबाजी केली जाते असे सांगून जेटली म्हणाले, की यंदा मान्सून फार चांगला असणार नाही अशा बातम्या असल्याने साठेबाजांनी त्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला.