१६ शाल विक्रेत्यांनी मसुरी सोडून काढता पाय घेतला आहे. हे सगळे शाल विक्रेते देहरादुनला रवाना झाले आहेत. दोन शाल विक्रेत्यांवर हल्ला झाला आणि त्यांना मारहाण करण्यात आली. २२ एप्रिलला पहलगाममध्ये अतिरेक्यांनी जो हल्ला पर्यटकांवर केला त्यानंतर २३ एप्रिलला शाल विक्रेत्यांना मारहाण झाली. यानंतर १६ शाल विक्रेत्यांनी मसुरी सोडत देहरादुनला जाणं पसंत केलं आहे. पोलिसांनी शाल विक्रेत्यांच्या मारहाण प्रकरणी तिघांना अटक केली आहे. मात्र आमच्या बाजूने उभं राहणारं कुणीही नाही म्हणत शाल विक्रेत्यांनी मसुरी सोडलं आहे.
नेमकी काय घटना घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काश्मिरी शाल आणि कपडे विकणाऱ्या दोन विक्रेत्यांना मारहाण करण्यात आली. मसुरीतल्या मॉल रोड भागात ही घटना घडली. या दोघांवर एका जमावाने हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. दरम्यान या सगळ्यांनी आता मसुरी सोडलं आहे. शाल विक्रेता शबीर अहमदने सांगितलं की मसुरीला मी १८ वर्षांपासून येतो आहे. हिवाळ्यात आम्ही देहरादूनला जातो आणि उन्हाळ्यात मसुरीला येत असतो. या ठिकाणी असलेल्या मशिदीजवळ आमचं वास्तव्य असतं. इथल्या स्थानिकांनाही याबाबत माहिती आहे. आजवर आमच्यापैकी कुणालाही कधीही मारहाण झाली नव्हती. मात्र आता आम्हाला मारहाण झाली आहे आणि आमच्या बाजूने उभं राहणारं कुणीही नाही. काश्मीरमध्ये इतरही विक्रेते येतात पण अशा अप्रिय घटना या ठिकाणी कधीही घडलेल्या नाहीत.
शाल विक्रेत्यांचं म्हणणं काय?
या विक्रेत्याने सांगितलं की रात्री ११ च्या दरम्यान पोलीस आले. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमची मदत करु शकत नाही. कारण पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लोकांमध्ये संताप आहे. तुम्ही इथून तुमची दुकानं सोडून जा. आमची मदत कुणीही केली नाही त्यामुळे आम्हाला आता मसुरी सोडावी लागते आहे. साधारण १५ शाल विक्रेत्यांनी देहरादूनला जाणं पसंत केलं आहे. हे लोक जम्मूला जातील आणि तिथून स्थानिक वाहनाने घर गाठतील. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.