बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुस्लीम मंत्र्याला घेऊन गया येथील विष्णूपद मंदिरात प्रवेश केल्यामुळे येथे चांगलाच वाद पेटला आहे. विष्णूपद मंदिरात गैरहिंदूंना प्रवेश नसतानाही नितीशकुमार यांनी मंत्री मोहम्मद इस्राईल मन्सुरी यांच्यासोबत मंदिरात प्रवेश केल्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. मागील १०० वर्षांपासून विष्णूपद मंदिरात गैरहिंदूंना प्रवेश दिला जात नाही, असा दावा भाजपाने केला आहे.

हेही वाचा >>> “भाजपा पक्ष मुस्लिमांचा द्वेष करतो, आमदाराच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे मोदी समर्थन करतात का?” असदुद्दीन ओवैसींचा परखड सवाल

नितीशकुमार यांनी माफी मागावी

“गया येथील विष्णूपद मंदिरात गैरहिंदूंना प्रवेश दिला जात नाही हे नितीशकुमार यांना माहिती आहे. असे असताना हिंदूंची चेष्टा करण्यासाठी नितीशकुमार गैरहिंदू व्यक्तीला घेऊन मंदिरात गेले. हे एक षड्यंत्र आहे. त्यांनी हिंदूंची माफी मागायला हवी,” अशी मागणी बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एस जैस्वाल यांनी केली आहे. भाजपाजे प्रवक्ते निखिल आनंद यांनीदेखील नितीशकुमार यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> ओवेसी बंधूंनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरे संतापले; म्हणाले, “यांच्यासारखे दळिद्री…”

नितीशकुमार यांनी मंत्री मोहम्मद इस्राईल मन्सुरी यांच्यासह विष्णूपद मंदिरात प्रवेश केल्यामुळे मंदिर समितीनेदेखील नाराजी व्यक्त केली आहे. “मुख्यमंत्री नितीशकुमार एका गैरहिंदू मंत्र्याला घेऊन मंदिरात आल्याची आम्हाला कल्पना नव्हती. ज्यांना याची कल्पना होती, त्यांनी तेव्हाच हे थांबवायला हवे होते. याआधी अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आणि नेते विष्णूपद मंदिरात आलेले आहेत. मात्र ते कधीही गैरहिंदूंना सोबत घेऊन आलेले नाहीत. या चुकीबद्दल नितीशकुमार यांनी माफी मागितली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया मंदिर समितीचे कार्याध्यक्ष शंभूलाल बिठ्ठल यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> बिल्किस बानो प्रकरण: गुजरात सरकारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

नेमके प्रकरण काय आहे?

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गया येथील विष्णूपद मंदिरात जेऊन देवाचे दर्शन घेतले. तसेच येथे पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत काही नेतेदेखील होते. यामध्ये मंत्री मोहम्मद इस्राईल मन्सुरी हेदेखील उपस्थित होते. मात्र या मंदिरात गैरहिंदूंना प्रवेश नाही. तसे फलक या मंदिरात लावण्यात आलेले आहे. याच कारणामुळे नितीशकुमार यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.