उत्तर कोरियाने जपानवरून डागलेल्या क्षेपणास्त्राचा भारताने निषेध नोंदवला आहे. यामुळे जपानसह लगतच्या परिसरातील शांती आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे भारताने म्हटले आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्यानंतर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनेही निषेध नोंदवला आहे. पाच वर्षांत उत्तर कोरियाने जपानवर डागलेले हे पहिले क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र मंगळवारी जपानच्या क्षेत्रात असलेल्या प्रशांत महासागरात सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी पडले होते.

उत्तर कोरियाने जपानवरुन क्षेपणास्त्र डागले; नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला

या वर्षांत उत्तर कोरियाने २४ वेळा क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. “उत्तर कोरियाने डागलेल्या क्षेपणास्त्राची आम्ही दखल घेतली आहे” असे संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सुरक्षा परिषदेत म्हटले आहे. या घटनेवर संयुक्त राष्ट्रामधील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी ब्राझिल, भारत, आर्यलँड, जपान, नॉर्वे, दक्षिण कोरिया, इंग्लंड, सौदी अरेबियासह ११ देशांच्यावतीने संयुक्त निवेदन जारी केले आहे. या प्रक्षेपणाने सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे उल्लंघन केले आहे. यामुळे केवळ जपानमधील प्रदेशालाच नाही तर आंतरराष्ट्रीय समाजाला धोका निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Mexico Firing : अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये गोळीबार, महापौरांसह १८ जणांचा मृत्यू

संयुक्त राष्ट्रामधील उत्तर कोरियाशी संबंधित ठरावांची पूर्णपणे अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी रुचिरा कंबोज यांनी केली आहे. कोरियन द्वीपकल्पात शांती आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे सामूहिक हिताचे आहे. या द्वीपकल्पातील समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचे आम्ही समर्थन करतो, असे कंबोज यांनी म्हटले आहे. कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त व्हावा, यासाठीही पाठिंबा असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.