पीटीआय, मॉस्को
भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा महत्त्वाच्या पाणीपुरवठ्यात अडथळे आणले तर आम्ही अण्वस्त्रांसह सर्व शक्तिनिशी प्रतिसाद देऊ, अशी धमकी पाकिस्तानचे रशियातील राजदूत मुहम्मद खालिद जमाली यांनी दिली आहे. जमाली यांनी रविवारी रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘टीएएसएस’ला मुलाखत दिली. त्यामध्ये ‘‘आम्ही पारंपरिक आणि आण्विक या दोन्ही बळांचा संपूर्ण वापर करू,’’ असे ते म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई करताना सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली, तसेच चिनाब नदीवरील बागलिहार धरणाचा पाण्याचा प्रवाह रोखला आहे. झेलम नदीवरील किशनगंगा धरणातून पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय लवकरच होण्याची अपेक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या राजदूतांनी भारताला धमकी दिली आहे.
एकीकडे अण्वस्त्र वापराची धमकी देतानाच, जमाली यांनी दोन्ही देशांदरम्यानचा तणाव कमी करण्याची गरज आहे असे नमूद केले. अण्वस्त्र वापरामुळे दोन्ही देशांना धोका निर्माण होईल असे ते म्हणाले. पहलगाम हल्ल्याच्या तपासात रशिया आणि चीनसारख्या देशांनी सहभागी व्हावे या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
खालील बाजूला (पाकिस्तानात) येणारे पाणी स्वत:साठी अडवण्याचा किंवा थांबवण्याचा किंवा वळवण्याचा कोणताही प्रयत्न हा पाकिस्तानविरोधात युद्धाचा प्रयत्न मानला जाईल आणि आम्ही त्याला अण्वस्त्रांसह संपूर्ण ताकदीने प्रतिसाद देऊ. – मुहम्मद खालिद जमाली, पाकिस्तानचे रशियातील राजदूत
पाकिस्तानची पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी
इस्लामाबाद : पाकिस्तानने सोमवारी फताह मालिकेतील क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचा पल्ला १२० किलोमीटर इतका आहे. सध्या ‘इंडस’अंतर्गत सुरू असलेल्या कवायतींचा भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली असे पाकिस्तानी लष्कराने सांगितले.
पाकिस्तानात सर्वपक्षीय चर्चा
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नागरी आणि लष्करी नेतृत्वाने सर्व राजकीय पक्षांना भारताबरोबरच्या तणावाच्या परिस्थितीची माहिती दिली. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्ष या बैठकीला उपस्थित नव्हता. भारताकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही हल्ल्याच्या परिस्थितीत सरकारबरोबर राहू असे सर्व पक्षांनी सांगितले.
जपानचा भारताला पाठिंबा
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आपला देश भारताबरोबर असल्याचे जपानचे संरक्षणमंत्री जेन नाकातानी यांनी सांगितले अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी दिली. नाकातानी यांनी हल्ल्याचा निषेध केला तसेच दहशतवादाविरोधातील लढाईत भारताला पाठिंबा असल्याचे सिंह यांना सांगितले. राजनाथ सिंह यांच्यासह संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नाकातानी यांचे स्वागत केले.
हिंद-प्रशांत महासागर प्रदेशात चीन आपले लष्करी सामर्थ्य वाढवत असताना भारत आणि जपानदरम्यान द्विपक्षीय संरक्षण क्षेत्रातील संबंध वाढवण्यासाठी दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांदरम्यान चर्चा झाली. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीदरम्यान संभाषणाला सुरुवात करताना सिंह यांनी जपानने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारताची जपानबरोबर विशेष, सामरिक आणि जागतिक भागीदारी आहे. या द्विपक्षीय चर्चेमध्ये आम्ही संरक्षण सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली असे त्यांनी नंतर समाजमाध्यमावर लिहिले.
इराणचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानात
इस्लामाबाद : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघाची यांचे सोमवारी एका दिवसाच्या भेटीवर पाकिस्तानात आगमन झाले. ते पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान मोहम्मद इशाक दार यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत असे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले. इराणने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा तणाव कमी करण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
तणाव वाढल्यास पाकिस्तानला तोटा ‘मूडीज’
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढल्यास त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही, पण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी तो मोठा धक्का असेल असा अंदाज ‘मूडीज रेटिंग्ज’ने सोमवारी वर्तवला. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटातून जाणाऱ्या पाकिस्तानची राखीव परकीय गंगाजळी आटलेली आहे आणि परिस्थिती चिघळल्यास त्या देशाच्या वाढीला फटका बसू शकतो असे ‘मूडीज’च्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे.