काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मित्रों’ या लोकप्रिय शब्दाची खिल्ली उडवली आहे. मोदी त्यांच्या भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी ‘मित्रो’ या शब्दाचा वापर करतात. शशी थरूर यांनी ‘ओ मित्रों’ या शब्दाची तुलना करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटसोबत केली आहे. ‘ओ मित्रो’ हे ओमाक्रॉनपेक्षा कितीतरी जास्त धोकादायक आहे, असं शशी थरूर म्हणाले. “ओमायक्रॉनपेक्षा कितीतरी जास्त धोकादायक 'ओ मित्रों' आहे! दररोज आपण देशात वाढलेले ध्रुवीकरण, द्वेष आणि धर्मांधतेला चालना, संविधानावरील हल्ले आणि आपली लोकशाही कमकुवत होताना पाहत आहोत. या विषाणूचा कोणताही ‘सौम्य प्रकार’ नाही,” असं शशी थरूर यांनी ट्वीट करत म्हटलंय. शशी थरूर यांच्या या ट्विटला उत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, देशात करोना विषाणूची गंभीर परिस्थिती असताना असे राजकारण करणे चुकीचे आहे. शहजाद पूनावाला यांनी ट्विट केले की, 'काँग्रेस महामारीला राजकारणाच्या वर ठेवू शकते का? आधी काँग्रेसने लसीबद्दल लोकांमध्ये संभ्रम पसरवला आणि आता म्हणतात की ओमिक्रॉन धोकादायक नाही. करोनाच्या सुरूवातीला अखिलेश यादव म्हणाले होते, की CAA करोना व्हायरसपेक्षा धोकादायक आहे. या लोकांना जबाबदारीची जाणीव नाही का? त्यांच्यासाठी करोनाला विरोध करण्यापेक्षा मोदींना विरोध करणं महत्त्वाचं झालं आहे का? दरम्यान, शशी थरूर गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत. २९ जानेवारी रोजी, त्यांनी योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ शेअर केला आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी देशाचे किती नुकसान केले आहे याची कल्पना नसल्याचे सांगितले. "हा देश स्मशानात बदलला आहे," असं ते व्हिडीओ शेअर करताना म्हणाले होते. नुकतेच काँग्रेसचे दिग्गज नेते आरपीएन सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता, त्यावेळीही शशी थरूर यांनी ट्विट करून त्यांना टोला लगावला होता.