ओडिशा सरकारने जवद चक्रीवादळासंदर्भात इशारा दिलाय. ४ डिसेंबर रोजी हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किनारपट्टी भागातील १३ जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यावं असे आदेश दिलेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमानच्या समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याची तीव्रता सध्या वाढत आहे. २ डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला जवद असं नाव देण्यात आलं आहे. सौदी अरेबियाने हे नाव दिलं आहे. जवद हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदत पोहचता यावी यासाठी ओडिशा सरकारने उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, ओडिशा आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशामन दलाच्या तुकड्यांची मदत घेण्यात येणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे आयुक्त पी. के. जेना यांनी समुद्रामध्ये वादळ निर्मितीसंदर्भातील परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. हवेचा वेग हा ४५ ते ५५ किमी प्रती तास इतका आहे. शुक्रवारी हवेचा वेग ६५ किमी प्रती तास इतका असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. शनिवारी पहाटच्या सुमारास हे वादळ लॅण्ड फॉल करेल म्हणजेच समुद्रामधून जमीनीवर दाखल होईल. याचा फटका ओडिशाबरोबरच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागाला बसण्याची शक्यता आहे. हे वादळ जमीनीला धडकेल तेव्हा त्याचा वेग ८० ते ९० किमी प्रती तास इतका असेल. भारतीय हवामान खात्याचे महानिर्देशक मृत्यूंजय महापात्रा यांनी हे वादळ ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र लॅण्डफॉल नक्की कुठे होणार हे सांगता येणार नाही असं म्हटलंय. ओडिशाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ३ डिसेंबरपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. ओडिशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीचा भाग असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तीन डिसेंबरपासून जोरदार पाऊस होईल असं महापात्रा म्हणालेत. हवामान विभागाने गजपति, गंजम, पुरी आणि जगतसिंहपूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलाय. तर क्रेंद्रपाडा, कटक, खुर्दा, नयागड, कंधमाल, रायगड आणि कोराटपुट जिल्ह्यांमध्ये शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.