मुंबईमध्ये ओमायक्रॉन या नवीन करोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण सोमवारी म्हणजेच ६ डिसेंबर २०२१ रोजी आढळून आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे ओमायक्रॉन या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही मागण्या केल्या आहेत. आदित्य यांनी यासंदर्भातील पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांना लिहिलं असून याबद्दलची माहिती त्यांनीच ट्विटरवरुन दिलीय. आदित्य यांनी केलेल्या मागण्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस घेण्यास परवानगी देण्याबरोबरच करोना लसीकरणासाठीचं किमान वयोमर्यादा १८ वरुन १५ करण्याची मागणी आदित्य यांनी केलीय.

नक्की वाचा >> Coronavirus: ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच समोर आली दिलासादायक आकडेवारी; मागील दीड वर्षांमध्ये पहिल्यांदाच…

मागील काही महिन्यांमध्ये भारतामधील करोना प्रातिबंधक लसीकरण मोहीम ही अगदी जोमाने सुरु आहे. देशामधील नागरिकांना करोना संसर्गापासून सुरक्षित करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. आपल्या देशामधील व्यवहार आणि सर्वसामान्य जीवनक्रम सुरळीत झाला आहे. मात्र आता ओमायक्रॉनचा धोका उद्भवला आहे. याचसंदर्भात मी तुम्हाला दोन गोष्टी सुचवू इच्छितो, असं अदित्य यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> ओमायक्रॉन: हिंसाचार, जाळपोळ अन्…; निर्बंधांच्या भितीने अनेक देशांमधील परिस्थिती चिघळली, पण WHO म्हणतंय…

याच वर्षाच्या सुरुवातील करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या करोना योद्ध्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तिसरा डोस (बुस्टर डोस) घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी पहिली मागणी आदित्य यांनी केलीय. तर दुसरी मागणी करताना आदित्य यांनी, “मी वेगवेगळ्या डॉक्टरांसोबत केलेल्या चर्चेनंतर असं वाटतं आहे की करोना लसीकरणाची किमान वयोमर्यादा ही १५ वर्षांपर्यंत करता येईल. असं केल्यास उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही करोना संरक्षण कवच पुरवता येऊ शकतं,” असं म्हटलंय.

नक्की वाचा >> चिंता वाढवणारी बातमी! देशात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित महाराष्ट्रात; पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण

तसेच मुंबईमध्ये लस घेण्यास पात्र असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. तर ७३ टक्के पात्र लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहितीही आदित्य यांनी दिलीय. त्यामुळेच दोन लसींच्या डोसमधील कालावधी चार आठवड्यांचा केला तर परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे लसीकरण केलं जातं तसं जानेवारी २०२२ च्या मध्यापर्यंत मुंबईतील सर्व पात्र नागरिकांना दोन्ही डोस देण्याचं उद्दीष्ट पूर्ण करता येईल. यामुळे अधिक लसी लागणार नाहीत किंवा कालावधीमध्येही फार फेरफार करावा लागणार नाही, अशी आशा अदित्य यांनी व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> बिहार: स्वॅब कलेक्ट केलेल्यांच्या यादीत मोदी, अमित शाह, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार; करोना सॅम्पल कलेक्शन यादीचा फोटो व्हायरल

करोनापासून आपल्या देशाला आणि देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी वरील मागण्यांसंदर्भात तुमच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आपेक्षा आहे, असंही आदित्य पत्राच्या शेवटी म्हणाले आहेत.

करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूने सोमवारी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे.