भारतीय स्पर्धा आयोगाचा ठपका
महिना-दोन महिन्यांतून कांद्याचे दर गगनाला भिडत असल्याबद्दल उत्पादन घटले, आवक रोडावणे अशी कारणे दिली जात असली तरी प्रत्यक्षात कांदा बाजारातील व्यापाऱ्यांनी नफेखोरीसाठी केलेले संगनमत आणि साठेबाजी यामुळे कांदा महाग होतो, असा थेट ठपका भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) ठेवला आहे. कांद्याच्या भावातील चढउतारांचा देशाच्या अन्नसुरक्षेबरोबरच ग्राहक-शेतकरी हितावरही विपरीत परिणाम होत असल्याचा अहवालही सीसीआयने दिला आहे.
बेंगळुरूमधील ‘इन्स्टिटय़ूट फॉर सोशल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक चेंज’ने सीसीआयच्या वतीने कांद्याच्या बदलत्या किमतींबद्दल अभ्यास केला. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील कांदा बाजारांतील पाहणीनंतर केलेला अहवाल डिसेंबरमध्येच सीसीआयकडे सोपवण्यात आला आहे. ‘हंगामनिहाय किंमत निर्देशांक, सहसंबंध, दैनिक-मासिक आवक यांची तुलना केली असता कांदा बाजारात मोठय़ा प्रमाणात नफेखोरी सुरू असल्याचे दिसते, असे या अहवालात म्हटले आहे. याला व्यापारी व दलालांचे संगनमत प्रामुख्याने कारणीभूत असून शेतकरी व ग्राहक या दोघांनाही त्याचा मोठा फटका बसतो,’ असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अशा वाढतात कांद्याच्या किमती
*  कांदा बाजारातील काही मोठे व्यापाऱ्यांचे मध्यस्थ व दलालांशी संधान. हे दोन्ही घटक कांद्याच्या किमती वाढवण्यासाठी संगनमताने त्याची साठेबाजी करतात
*  कांदा बाजाराच्या नाडय़ा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या हातात.
*  बहुतांश कांदा उत्पादक एक ते सव्वा एकर इतक्या कमी जमिनीवर शेती करीत असल्याने त्यांचे बाजारातील महत्त्व अत्यल्प असते.  खराब हवामान आणि नाशवंत पीक यामुळेही शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून घेता येत नाही.
*  विपणनाचा मोठा खर्च, अपुऱ्या बाजारपेठा, नव्या व्यापाऱ्यांना संधी न मिळणे, बाजारयंत्रणेत वारंवार होणारे संप या गोष्टींमुळेही कांद्याच्या किमती वाढतात.
अहवालात सुचवलेल्या उपाययोजना
*  व्यापाऱ्यांतील ‘साठगाठ’ रोखण्यासाठी कांदा लिलाव प्रक्रियेत एपीएमसीच्या अधिकाऱ्यांचा समावेश बंधनकारक करावा.
*  सहकारी विक्री महासंघ किंवा विपणन संस्थांना प्रोत्साहन द्यावे