India Airstrike Operation Sindoor: भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस एअरलाइन्सनी बुधवारी देशातील काही ठिकाणी जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे आज दुपारपर्यंत रद्द केली आहेत.
एक्सवर याबाबत माहिती देताना, एअर इंडिया एअरलाइन्सने सांगितले की, “जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथून पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली जात आहेत.
“सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता, एअर इंडियाने ७ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथून येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे रद्द पुढील सूचना येईपर्यंत रद्द केली आहेत. सध्या अमृतसरला जाणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांना दिल्लीकडे वळवण्यात येत आहे. या अनपेक्षित व्यत्ययामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला वाईट वाटते,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
दुसरीकडे एअर इंडिया एक्सप्रेसनेही एक्सवरील एका पोस्टमध्ये प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला. “प्रचलित निर्बंधांमुळे आमच्या मार्गावरील अनेक उड्डाणे प्रभावित झाली आहेत. उड्डाणांमधील अलर्ट आणि सूचनांसाठी, कृपया तुमचे संपर्क तपशील http://airindiaexpress.com/manage-booking वर अपडेट केले आहेत याची खात्री करा,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, स्पाइसजेट एअरलाइन्सनेही देशाच्या उत्तरेकडील भागातील विमानतळांवरून उड्डाणांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. एक्सवर एका पोस्टमध्ये साइसजेटने म्हटले की, धर्मशाळा, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळे पुढील सूचना येईपर्यंत बंद राहतील. यामुळे निर्गमन, आगमन आणि उड्डाणांवर देखील परिणाम होईल.
नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले
भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. हे हवाई हल्ले २०१९ मध्ये बालाकोटमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर आणि २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताने केलेला सर्वात मोठा हवाई हल्ला होता.
दरम्यान ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब टाकले आहेत, ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय हवाई दल आणि लष्कराचे ऑपरेशन होते. एकीकडे, आयएएफच्या लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले, तर दुसरीकडे, लष्कराने क्षेपणास्त्रांचा वापर देखील केला. भारतीय सैन्याच्या हल्ल्यांची ताकद इतकी प्रचंड होती की पाकिस्तानी हवाई दलाला भारतीय हवाई दलाने क्षेपणास्त्रे डागल्याचे लक्षातही आले नाही.