पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून केलेला एअर स्ट्राईक दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणारा ठरला. जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनांची मुख्यालयं भारतानं या हल्ल्यात उद्ध्वस्त केली. पाकिस्तानला अद्दल घडली आणि पहलगाममधील मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला. पण याहून वेगळी अशी एक बाब या एअर स्ट्राईकमुळे अधोरेखित झाली, जी फक्त पाकिस्तानच नाही, तर अवघ्या जगानं मान्य केली! ‘घर में घुस के मारा’ म्हणत भारतीय हवाई दल पाकिस्तानात तब्बल १५० किमी आतपर्यंत शिरलं होतं. दरम्यान आजच सर्वपक्षीय बैठक पार पडली. ज्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?
देशाच्या हितासाठी काही विषय गुप्त ठेवण्यात आले आहेत. असं आम्हाला बैठकीत सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी सांगितलं की संकट काळात आम्ही सगळे तुमच्या पाठिंब्याशी आहोत. देशहितासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या बैठकीला नव्हते आणि या बैठकीलाही नव्हते. संसदेपेक्षा आपण मोठे आहोत असं पंतप्रधानांना वाटत असेल. पण सध्याचा काळ टीका करण्याचा नाही. संकटकाळात आम्ही कुणावरही टीका करणार नाही असं खरगे यांनी म्हटलं आहे.
सर्वपक्षीय बैठकीत काय झालं?
सर्वपक्षीय बैठकीत असलेल्या सगळ्याच पक्षांनी सरकारच्या पाकिस्तानविरोधी भूमिकेला पाठिंबा दिला आहे. या बैठकीत राजनाथ सिंह आणि किरण रिजेजू यांनी महत्त्वाची माहिती दिली. तसंच राजनाथ सिंह उपस्थितांना असंही म्हणाले की कुणाला ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती किंवा इतर काही गोष्टी, मुद्दे विचारायचे असतील तर ते विचारा. ऑपरेशन सिंदूर हे अत्यंत संवदेनशील आहे त्यामुळे सगळी माहिती आम्हाला देता येणार नाही असंही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह प्रमुख विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे नेते उपस्थित होते.
संजय राऊत यांनी बैठकीपूर्वी काय म्हटलं होतं?
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि २६ भगिनींचं कूंकू पुसलं गेलं. त्यानंतर एक सर्वपक्षीय बैठक सरकारने घेतली. त्यावेळी शिवसेना उपस्थित नव्हती. आमची भूमिका होती की आधी कारवाई करा त्यानंतर आपण चर्चा करु. देशात तेव्हा आक्रोश होता, अशांतता होती. आता भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून कारवाई केली आहे. यामुळे भारताची ताकद सगळ्या जगाला दिसली. भारतीय सैन्य कशाप्रकारे कसा बदला घेऊ शकतं हे जगाला दिसलं. सरकारने कशाप्रकारे बदला घ्यायचा, उत्तर द्यायचं हे भारतीय सैन्यावर सोपवलं होतं आणि भारतीय सैन्याने ते करुन दाखवलं. असं संजय राऊत बैठकीपूर्वी म्हणाले होते.