Operation Sindoor : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात चार दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्याचा निषेध जगाने नोंदवला. त्यानंतर काही कालावधीतच या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचं कळलं होतं. ज्यानंतर भारताने ६ आणि ७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर आता या कारवाईचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी कौतुक केलं आहे.
मोहन भागवत यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
“ऑपरेशन सिंदूर भारत सरकारच्या नेतृत्वात आणि सैन्य दलांनी उचलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. जे क्रूर हत्याकांड दहशतवाद्यांनी घडवून आणलं आणि भ्याड हल्ला केला तेव्हापासूनच देशवासियांच्या मनात पीडित कुटुंबांना, माता भगिनींना न्याय मिळावा ही देशभावना होती. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आम्ही सरकारचं आणि सैन्य दलांचं अभिनंदन करतो.”
ऑपरेशन सिंदूरमध्ये देशवासीयांची छाती अभिमानने फुलून आली आहे-मोहन भागवत
सरकारने आणि सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवल्याने संपूर्ण देशाची हिंमत वाढली आहे आणि त्यांची छाती अभिमानाने फुलली आहे. पाकिस्तानने जे केलं त्यानंतर भारतीय सैन्य दलांनी दिलेलं उत्तर ही महत्त्वाची आणि अपरिहार्य कारवाई होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरु आहे. अशा संकट काळात आम्ही तन-मन-धनासह देशाच्या सरकारच्या आणि सैन्य दलांच्या पाठिशी आहोत. पाकिस्तानी सैन्याकडून सामान्य नागरिकांचा विचार न करता हल्ले केले जात आहेत. सीमा भाग आणि धार्मिक स्थळं यांना लक्ष्य केलं जातं आहे. या घटनांमध्ये ज्यांना प्राण गमावावा लागला त्यांच्या प्रति आमच्या सहवेदना आहेत. आम्ही त्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहोत. असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
देशवासीयांना संघाचं आवाहन काय?
सध्या आपण युद्धजन्य स्थितीत आहोत. या आव्हानात्मक परिस्थितीत संघ म्हणून आम्ही देशवासीयांना आवाहन करत आहोत की सरकारने दिलेल्या सूचना आणि निर्देशांचं तंतोतंत पालन करा. तसंच राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात आपल्याला आपली एकजूट दाखवून देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य बजावून सरकारतर्फे जे सांगितलं जाईल त्याचं तंतोतंत पालन या काळात करायला हवं आणि सरकारला सहकार्य करायला हवं. देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा यासाठी आवश्यक असलेल्या सरकारच्या सगळ्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे. असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.