India Air Strike on 9 Terrorists Camps in Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून केलेला एअर स्ट्राईक दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणारा ठरला. जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनांची मुख्यालयं भारतानं या हल्ल्यात उद्ध्वस्त केली. पाकिस्तानला अद्दल घडली आणि पहलगाममधील मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला. पण याहून वेगळी अशी एक बाब या एअर स्ट्राईकमुळे अधोरेखित झाली, जी फक्त पाकिस्तानच नाही, तर अवघ्या जगानं मान्य केली! ‘घर में घुस के मारा’ म्हणत भारतीय हवाई दल पाकिस्तानात तब्बल १५० किमी आतपर्यंत शिरलं!
फक्त २५ मिनिटं आणि दहशतवाद्यांचा बीमोड!

७ आणि ८ मेच्या मध्यरात्री भारतीय हवाई दलानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर फक्त २५ मिनिटं चाललं. पण या २५ मिनिटांमध्ये भारतानं पाकिस्तानमध्ये नवी ‘रेड लाईन’ अर्थात भारतीय सैन्याच्या टापूत येणारा पाकिस्तानचा भूभाग अधोरेखित केला. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी भारतीय लष्कराला २५ मिनिटं पुरेशी ठरली!

इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात दिलेल्या सविस्तर वृत्तामध्ये भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीचा उल्लेख केला आहे. भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानात अचूक माऱ्यासाठी वापरलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञान, भेदक क्षेपणास्त्रं आणि ठिकाणांची अचूक माहिती यातून भारताची हल्ल्याची क्षमता तर सिद्ध झालीच, पण भारत पाकिस्तानात आतपर्यंत शिरून वार करू शकतो, हेही अधोरेखित झालं असं या अधिकाऱ्याने सांगितलं. हे भारताचं फार मोठं पाऊल आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

उरी, बालाकोट ते ऑपरेशन सिंदूर

भारतानं गेल्या १० वर्षांत पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यांमधून टप्प्याटप्प्याने आपली पाकिस्तानी हद्दीत कारवाई करण्याची क्षमता वाढवत नेली आहे. २०१६ मध्ये भारतानं उरी हल्ला केला तेव्हा लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये ३ किलोमीटरपर्यंत शिरकाव केला होता. पुलवामा हल्ल्यानंतर २०१९ मध्ये भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकसाठी भारतीय हवाई दल पाकिस्तानच्या हद्दीत ६० किलोमीटरपर्यंत शिरलं होतं. आता ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय हवाई दल थेट बहावलपूरपर्यंत अर्थात पाकिस्तानी सीमेमध्ये तब्बल १५० किलोमीटर आत घुसल्याचं स्पष्ट झालं आहे.

फक्त तळ नव्हे, दहशतवाद्यांचे मनसुबे उद्ध्वस्त!

दरम्यान, भारतीय हवाई दलानं या एअर स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त केलेले तळ हे पाकिस्तानकडून पोसल्या जाणाऱ्या दहशतवादासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. मुरीदके, बहावलपूर आणि कोटली या ठिकाणी असणारे तळ हे भारतात झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांच्या नियोजनाचे केंद्र होते. लाहोरच्या बाहेरच्या बाजूला तब्बल २०० एकरमध्ये पसरलेल्या मुरीदके तळावर भारतातील काही भीषण हल्ल्यांमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षित करण्यात आलं होतं. त्यात कारगिल युद्धावेळी झालेल्या सुसाईड बॉम्ब हल्ल्यापासून २६/११ ला झालेल्या मुंबई हल्ल्यापर्यंतच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.

मुंबई हल्ल्यात पकडला गेलेल्या अजमल कसाबचं मुरीदके हे गाव आहे. त्याच तळावर अजमल कसाब, तसेच डेविड कोलमन हेडली यांना प्रशिक्षित करण्यात आलं होतं. शिवाय हे हाफीज सैदच्या जमात उद दावाचं मुख्यालय होतं. दुसरीकडे बहावलपूर हेदेखील दहशतवाद्यांसाठी महत्त्वाचं केंद्र होतं. इथेच कुख्यात दहशतवादी मसूद अजहरचा जन्म झाला होता. याच ठिकाणी त्यानं जैश ए मोहम्मदचं बस्तान बसवलं होतं.

याचप्रकारे पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील कोटली हा तळ हिजबुल मुजाहिद्दीनसाठी महत्त्वाचं केंद्र होता. या तळाचा ९० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर काश्मीरमधील दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देण्यासाठी वापर केला गेला. हिजबुलचा म्होरक्या सैय्यद सलाहुद्दीन हा भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत सर्वात वर आहे.