Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने मध्यरात्री ‘एअर स्ट्राईक’ करत दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या ‘एअर स्ट्राईक’मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीतील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दहशतवाद्यांच्या ९ तळांना लक्ष्य करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत या ‘एअर स्ट्राईक’मध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबाचा देखील खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेने पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांसाठी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. भारताने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’नंतर अमेरिकेने पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांसाठी अॅडवायजरी जारी करत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासाने अमेरिकन लोकांना संघर्षग्रस्त क्षेत्रात प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. विशेषतः भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) प्रवास टाळण्यास सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र संघर्षाच्या धोक्यामुळे अमेरिकेने अॅडवायजरी जारी केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेपासून दूर रहा, या ठिकाणाहून प्रवास करू नका. तसेच उर्वरित पाकिस्तानातही फिरताना प्रवासाचा पुनर्विचार करा, अशा सूचना अॅडवायजरी जारी देण्यात आल्या आहेत. तसेच बुधवारी प्रसिद्ध झालेल्या एका निवेदनात अमेरिकेच्या दूतावासाने म्हटलं की भारत आणि पाकिस्तानमधील घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
अमेरिकेने काय सूचना दिल्या?
पाकिस्तानमधील अमेरिकन नागरिकांसाठी सूचना देताना अमेरिकेने म्हटलं की, भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेपासून दूर रहा. तसेच दोन्ही देशातील लष्करी संघर्ष किंवा तणावग्रस्त क्षेत्रापासून लांब राहा किंवा बाहेर पडणं टाळा आणि घरातच थांबा. तसेच नेहमी सतर्क रहा, तुमचं ओळखपत्र बाहेर पडताना बरोबर ठेवा. तसेच स्थानिक बातम्यांवर लक्ष असद्या आणि तुम्ही सुरक्षित आहात याची खात्री करा.
‘एअर स्ट्राईक’मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील १० जणांचा खात्मा
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील १० तर निकटवर्तीय असलेल्या ४ सदस्यांचा मृत्यू झाला. या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे.तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफाचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.