Operation Sindoor Updates: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी एका परदेशी पर्यटकासह २६ पर्यटकांची हत्या गोळ्या झाडून हत्या केली होती. पर्यटकांवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्यापक्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हवाई हल्ले करत ते उद्ध्वस्त केले आहेत.

यानंतर पाकिस्तानबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराने पश्चिम सीमेवर IGLA-S हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत आणि भारतीय हवाई दलाचे SU-30 MKI मध्ये प्रगत BVR क्षेपणास्त्रांनी सज्ज केले आहे. याबाबत दूरदर्शनच्या एका व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.

सीमेलगतच्या राज्यांना हाय अलर्ट

याचबरोबर केंद्र सरकारने संभाव्य धोक्यासाठी पूर्ण तयारी केल्याचे दिसत आहे. याचाच भाग म्हणून सीमेलगत असलेल्या राज्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे. राजस्थान आणि पंजाब राज्य अलर्ट मोडवर असून पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

राजस्थानची १ हजार ३७ किमीची सीमा पाकिस्तानला लागून आहे. त्यामुळे या राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या राज्याची सीमा पूर्णपणे सील करण्यात आली असून संशयास्पद हालचाली आढळल्यास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शूट अ‍ॅट साईटचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, भारतीय हवाई दलही सज्ज आहे.

पश्चिम क्षेत्रातील आकाशात लढाऊ विमाने गस्त घालत असल्याने जोधपूर, किशनग्रह आणि बिकानेर विमानतळ ८ मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तसंच, क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे.

ऑपरेशन सिंदूर

बुधवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने भारतीय सशस्त्र दलांनी पीओके आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले. भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात भूमिका बजावणाऱ्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबा नेतृत्व संपवण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने हल्ल्यांसाठी ही ठिकाणे निवडली होती.

२०१९ मध्ये बालाकोटमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर आणि २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताने केलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला होता.