Operation Sindoor Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या तळावर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हवाई हल्ले केले होते. यामध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर गुरुवारी रात्री जम्मूच्या सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया शहरांवर पाकिस्तानकडून आठ क्षेपणास्त्रे डागण्यात आली, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. या सर्व क्षेपणास्त्रांना भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने निकामी केले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. या भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिले आहे. काल रात्री पाकिस्तानने भारतीय शहरांना लक्ष्य करत हल्ले केल्याचे प्रयत्न केल्यानंतर दोन्ही देशामध्ये तणाव वाढला आहे. अशात या परिस्थितीवर अमेरिकेने भूमिका स्पष्ट केली असून, ते भारताला शस्त्रे खाली ठेवायला सांगू शकत नाहीत व त्यांना यामध्ये पडायचे नाही, अशी भूमिका अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी मांडली आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत, फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स म्हणाले की, “आपण लोकांना केवळ तणाव कमी करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु आपण अशा युद्धात अडकणार नाही जे मुळात आपले काम नाही आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अमेरिकेचा काहीही संबंध नाही.”

भारताला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही

ते पुढे म्हणाले की, “तुम्हाला माहिती आहे, अमेरिका भारताला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. आपण पाकिस्तानलाही शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. आणि म्हणून, आम्ही राजनैतिक माध्यमांद्वारे या गोष्टीचा पाठपुरावा करत राहणार आहोत. आशा अशी आहे की, या व्यापक प्रादेशिक युद्धाचे आण्विक संघर्षात रूपांतर होणार नाही. आम्हाला या गोष्टींबद्दल काळजी आहे. जर असे घडले तर ते विनाशकारी होईल परंतु सध्या आम्हाला वाटत नाही की असे काही घडेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

दरम्यान काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, त्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत काय सुरू आहे त्याची जाणीव आहे आणि दोन्ही देशांनी आता शांततेचा मार्ग स्वीकारावा अशी त्यांची इच्छा आहे. “माझी भूमिका स्पष्ट आहे, मी दोन्ही देशांसोबत काम करतो आणि त्यांनीच हे सोडवावे अशी माझी इच्छा आहे. ते एकमेकांच्या विरोधात आहेत, पण मला आशा आहे की ते आता हे थांबवू शकतील. जर काही मदत लागली तर मी त्यासाठी उपलब्ध असेन.”