Operation Sindoor Reactions: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्यप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर देशभरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनीही यासाठी भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत.

अशात आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनीही या कारवाईवर समाधान व्यक्त करत, जे शांततेच्या मार्गाने ऐकत नाहीत त्यांना धडा शिकवलाच पाहिजे असे म्हटले आहे.

श्री श्री रविशंकर म्हणाले की, “दहशतवाद हा मानवतेच्या विरोधात आहे आणि तो समूळ नष्ट केला पाहिजे. आपले देवांच्या एका हातात फूल आणि दुसऱ्या हातात शस्त्र आहे. जे राजनैतिक मार्गाने ऐकत नाहीत त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. भारताने या प्रकरणात एक उत्तम पाऊल उचलले आणि फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य केले. देशातील आणि परदेशातील भारतीयांना पुढे काय होईल याची भीती वाटत आहे. मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की सर्व काही व्यवस्थित होईल आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश योग्य निर्णय घेत आहे, त्यामुळे कोणीही दहशतवाद्यांची काळजी करू नये.”

तत्पूर्वी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनीही या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले की, “आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि भारतीयांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढनिश्चयी आहे.”

दरम्यान भारताने ज्या दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत, त्या तळांवर जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या तीन दहशतवादी संघटनांच्या तळांचा समावेश आहे.

भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानने आता थयथयाट सुरू केला आहे. भारतावर निराधार आरोपांचा कांगावा करण्याबरोबरच सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यापासून पाकिस्तानकडून वारंवार सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार होत होता.