India Pakistan War Tensions भारताने पाकिस्तानला उत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवत जोरदार हल्ले केले आहेत. भारताने पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले आणि अनेक दहशतवाद्यांच्या खात्मा केला आहे. सकाळी १० वाजता लष्कराची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यात नेमकं ऑपरेशन सिंदूर कसं राबवण्यात आलं याची माहिती देण्यात येईल.

पहलगाम हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू

पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. त्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या क्रूर आणि तेवढ्याच भ्याड हल्ल्यानंतर भारत काय करणार? पाकिस्तानला कसं उत्तर देणार? याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. त्याप्रमाणे आता ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कुठल्या ९ ठिकाणांवर हा हल्ला झाला? हे आपण जाणून घेऊ.

कुठल्या ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक?

१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद

पाकिस्तानचे धाबे दणाणले

अशा नऊ ठिकाणी हल्ला करुन पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान गर्भगळीत झाल्याचं चित्र आहे. आज मॉक ड्रीलची घोषणा देशभरात करण्यात आली होती. त्या रात्रीच १ वाजून ४४ मिनिटांनी भारताने लक्ष्यपूर्वक हल्ले करत पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केलं. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. रात्री १ वाजून ४४ वाजता हा स्ट्राईक करण्यात आला. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यरात्री दीडच्या दरम्यान हवाई हल्ला करुन जोरदार प्रत्युत्तर

भारतानं पाकिस्तानच्या हद्दीतील एकूण ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पाकिस्तानमधून कारवाया करणारे लष्कर ए तैय्यबा, जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवाद्यांच्या तळांवर भारतानं हा हल्ला केला आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे मोठे तळ उद्ध्वस्त झाले आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतानं हा हवाई हल्ला केला असून त्यात भारतानं कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केला नाही. फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य करून भारतानं जगासमोर आदर्श ठेवल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.