गेल्या आठवडय़ात तीन दिवसांमध्ये भूमध्य सागरात जहाजे फुटून किमान ७०० स्थलांतरित शरणार्थी मरण पावले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. इतर काही जहाजांनी हजारो शरणार्थीना साहसी मदत मोहिमेत वाचवल्याचेही समजते.

एप्रिल २०१५ पासून प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल २०१५ मध्ये एक जहाज बुडून ८०० लोक मरण पावले होते. मानवतावादी संघटनांच्या मते अनेक स्थलांतरितांचा पत्ताच लागलेला नाही तर काहींचे मृतदेह सापडलेले आहेत. युरोपकडे येत असताना या स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ‘सेव्ह द चिल्ड्रेन’ या संस्थेच्या इटलीतील प्रवक्तया गिवोना डी बेनेडेट्टो यांनी सांगितले, की गेल्या आठवडय़ात परिस्थिती खूपच वाईट बनली होती. एकूण ७०० लोक मरण पावले असतील तर ते धक्कादायक आहे. एरिट्रिया येथील फिलमन सेलोमन यांनी सांगितले, की दुसऱ्या एका बोटीत तीन तासांच्या प्रवासानंतर पाणी शिरले. त्यातील लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. सर्व बाजूंनी पाणी येत असल्याने ते अवघड होते. सहा तास प्रयत्न करूनही लोकांना वाचवता आले नाही. महंमद अली इमाम हा पाच दिवसांपूर्वी आला असून एका बोटीतील इंधन संपले होते तर दुसऱ्या बोटीत पाणी शिरू लागले होते. पोलिसांनी सांगितले, की तीनशे लोक दुसऱ्या बोटीने परत आले तर दोनशे जणांनी समुद्रात उडय़ा मारल्या त्यात ९० जण वाचले. पहिल्या बोटीतील ५०० जण वाचले होते. यात वाचलेल्यांनी बोटीचा कमांडर असलेल्या सुदानी व्यक्तीला ओळखले असून त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवून अटक करण्यात आली आहे. इतर तीन तस्करांनाही अटक करण्यात आली आहे.

((  जहाज दुर्घटनांनंतर भूमध्य सागरात मोहिम राहवून इटालियन नौसैनिकांनी अनेक स्थलांतरित दुर्घटनाग्रस्तांची सुटका केली.  )()