काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पाच वर्षांपासून गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या विजय रूपाणी यांना अचानक हटवल्याबद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. भाजपा केवळ आपल्या अयशस्वी मुख्यमंत्र्यांच्या बदल्यांमध्ये व्यस्त आहे आणि अशा मुख्यमंत्र्यांची यादी भाजपा शासित राज्यांमध्ये मोठी आहे असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. रविवारी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला होता. भाजपामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रुपाणी यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. यावरुन पी. चिदंबरम यांनी भाजपावर टीका केली आहे.

चिदंबरम यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून रुपाणी यांना हटवल्याबद्दल आणि त्यांच्या जागी पहिल्यांदाच आमदार झालेल्या भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रिपदी बसवल्याबद्दल ट्विट केले आहे. “भाजप आपल्या अपयशी मुख्यमंत्र्यांना हटवण्यात व्यस्त आहे. मुख्यमंत्री नीट काम करत नाहीत हे भाजपाला कधी कळेल?” असे चिदंबरम यांनी म्हटले.

भाजपने चांगले काम न केल्यामुळे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत आणि इतर अनेक राज्ये आहेत जिथे अपयशी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना बदलण्याची गरज आहे असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. “संबंधित राज्यातील लोकांना माहीत होते की बीएस येडियुरप्पा, दोन रावत आणि रूपाणी कित्येक महिने खराब कामगिरी करत होते. आणखी बरेच आहेत जे बदलले पाहिजेत. यादी लांबलचक आहे ज्यात हरियाणा, गोवा, त्रिपुरा इ.,” असे चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने वर्षभरात चार राज्यांतील पक्षाच्या पाच मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी केली. कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पा, हिमाचलमध्ये आधी त्रिवेंद्र सिंह रावत, मग तीरथ सिंह रावत, आसाममध्ये सर्बानंद सोनोवाल आणि शनिवारी गुजरातमध्ये गच्छंती झालेले विजय रुपाणी हे पाचवे मुख्यमंत्री आहेत.

रविवारी, रुपाणी यांनी गुजरातमधील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आली. मार्चमध्ये उत्तराखंडचे चार वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले त्रिवेंद्र सिंह रावत यांची जागा तिरथ रावत यांनी मुख्यमंत्री करण्यात आले. पण अवघ्या तीन महिन्यांतच त्यांची जागा पुष्करसिंग धामी यांनी घेतली.