Pahalgam Attack : २२ एप्रिल या दिवशी काश्मीरमधल्या पहलगाम मध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी जो गोळीबार केला त्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. यानंतर पाकिस्तानच्या विरोधात सरकारने पाच मोठे निर्णयही घेतले आहेत. पर्यटकांनी सांगितलेले अनुभव आणि थरार दोन्हीही अंगावर काटा आणणारंच ठरलं आहे. एका डोळ्यांत आसू आणि दुसऱ्या डोळ्यांत चिड अशी प्रत्येक भारतीयाची भावना आहे. आपण जाणून घेऊ काय घडामोडी घडल्या?
मंगळवारी दुपारी २२ एप्रिलला काय घडलं?
काश्मीर या ठिकाणी असलेल्या पहलगाममध्ये लोक नेहमीप्रमाणे सुट्टी एंजॉय करत होते. काही जण मधुचंद्रासाठी आले होते. कुणी सुट्टी असल्याने थंड हवेचं ठिकाण काश्मीरला भेट द्यायला आले होते. पहलगामला मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं. या खास ठिकाणाचा अनुभव पर्यटक घेत होते. दोन ते अडीच्या सुमारास गोळीबाराचा आवाज येऊ लागला. त्यानंतर दहशतवाद्यांनी हल्ला केला. काय होतंय काही कळायच्या आतच एकच हलकल्लोळ माजला. दहशतवाद्यांनी गोळीबार करुन २६ जणांना ठार केलं.
गुलझार अहमद या स्थानिकाने सांगितली घटना
गुलझार अहमद नावाचा स्थानिक म्हणाला “आम्ही इथल्या (पहलगाम) स्टँडजवळ शांतपणे उभे होतो. काही पर्यटक वरच्या बाजूला गेले होते. अचानक आम्ही पाहिलं लोक सैरावैरा धावू लागले, त्या पाठोपाठ किंकाळ्या आणि आरडाओरडा ऐकू आला. तेव्हा हे स्पष्टच झालं की काहीतरी भयंकर घडतं आहे. नंतर काही क्षणात समजलं की हल्लेखोरांनी पर्यटकांवर गोळीबार सुरु केला आहे. त्यामुळे पर्यटक घाबरले, त्यांचा गोंधळही वाढला तो क्षण मी कधीच विसरु शकत नाही.”

हल्ला नेमका कुणी केला?
४ दहशतवादी होते, जे तुमचा धर्म कुठला? अशी विचारणा करुन गोळ्या झाडत होते. एका पर्यटक महिलेने ही माहिती दिली की चार जण आमची नावं विचारत होते आणि विचारत होते की तुम्ही हिंदू आहात का? त्यानंतर ते पुरुषांवर गोळ्या झाडत होते. महिला आणि लहान मुलांना त्यांनी काही केलं नाही. जे काही घडलं ते इतकं अचानक घडलं की कुणाला कसलाही विचार करायला वेळ मिळाला नाही. माझ्या नवऱ्याला त्यांनी पाँईंट ब्लँक रेंजवरुन गोळी झाडली आणि ठार केलं. असं एका महिलेने रडत रडत सांगितलं.
हिंदू आहात का विचारुन गोळीबार
या हल्ल्यात जे पर्यटक अडकले होते त्यांनी सांगितलं की जेव्हा चारही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला तेव्हा तिथे असलेल्या लोकांना ते धर्म विचारत होते. तुम्ही हिंदू आहात का? हा त्यांचा प्रश्न होता. तसंच आमच्या पैकी काही लोकांना त्यांनी कलमा पठण करण्यास सांगितलं असंही हल्ल्यातून वाचलेल्या एका महिलेने सांगितलं. ज्यांना कलमा पठण करता आलं नाही किंवा ज्यांनी नकार दिला अशांवर त्यांनी गोळ्या झाडल्या.
त्या व्हायरल फोटोची चर्चा
नौदल अधिकारी असलेल्या विनय नरवाल यांना दहशतवाद्यांनी धर्म विचारुन ठार केलं. विनय नरवाल आणि हिमांशी यांचं लग्न १६ एप्रिल रोजी झालं होतं. ते दोघंही मधुचंद्रासाठी काश्मीरला आले होते. सुखी संसाराची स्वप्नं रंगवत होते. मात्र हल्ला झाला आणि विनय यांचा मृत्यू झाला. ज्यानंतर त्यांच्या मृतदेहावळ बसून मूक आक्रोश करणाऱ्या हिमांशी नरवाल यांचा फोटो पुढच्या काही क्षणांत व्हायरल झाला. मृत्यूचं क्रौर्य काय असतं, स्वप्नांची राखरांगोळी झाल्यावर काय होतं त्या सगळ्या भावना सांगणारा हा फोटो ठरला. बैसरन व्हॅली या ठिकाणी हा हल्ला झाला. या ठिकाणी पायी जाण्यासाठी चार तास तर घोडे किंवा खेचरांनी जाण्यास तीन तास लागतात. दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान झालेला हा हल्ला आणि त्यासंदर्भातल्या बातम्या समोर येण्यसाठी संध्याकाळचे ६ ते ६.३० झाले त्याचं कारणही हेच आहे. जे पर्यटक हल्ल्यात अडकले होते त्यांनी घोड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांनी आणि इतर स्थानिकांनी मदत केली आणि सुरक्षित स्थळी पोहचवलं.

मृत्यूच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कहाण्या समोर
कर्नाटक येथील पल्लवी या महिलेने तिच्या नवऱ्यासह तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. हे दोघंही पहलगामला गेले होते. दोघंही छान हसत आहेत आणि सुट्टीचा आनंद लुटत आहेत असं या व्हिडीओत दिसतं आहे. पल्लवी यांनी लिहिलं हा माझ्या नवऱ्यासह शेवटचा व्हिडीओ. दहशतवाद्यांनी माझ्या नवऱ्याला ठार केलं. मी त्यांना म्हणाले मलाही मारुन टाका. त्यावर दहशतवादी म्हणाले तुला मारणार नाही जा मोदींना सांग आम्ही हे केलं आहे असं त्यांनी सांगितलं.
काही वेळातच दहशतवाद्यांची रेखाचित्रं समोर
हल्ल्याची घटना समोर आल्यानंतर काळीज हादरवणारे हे व्हिडीओ आणि फोटो समोर आले. २६ निष्पाप पर्यटकांना चार दहशतवाद्यांनी धर्म आणि नावं विचारुन ठार केलं. या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दहशतवाद्यांची रेखाचित्रं समोर आली. हे सगळे दहशतवादी लष्कर ए तैयब्बा या संस्थेशी निगडीत असलेल्या द रेझिस्टंन्स फ्रंट या संघटनेने या हल्ल्याची जबाबादारी घेतली. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हा पूर्वनियोजित कट होता. दहशतवाद्यांनी कुठे पर्यटक जास्त प्रमाणात असतात हे पाहून हा कट आखला होता. पर्यटकांची गर्दी होते आहे का? याची ते शांतपणे वाट बघत होते आणि त्यानंतर त्यांनी भारतीय पर्यटकांवर हा हल्ला केला.
राजकीय घडामोडींना वेग
काश्मीरच्या पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यानंतर त्याची दखल तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली. तसंच जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी जो हल्ला झाला त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमित शाह यांच्याशी चर्चा केली. तसंच पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परतले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही त्यांचा अमेरिका दौरा केला. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरुन हल्ल्याबाबतची चर्चा केली आणि माहिती जाणून घेतली.

काश्मीर खोऱ्यात सर्च ऑपरेशन सुरु
पहलगाम हल्ल्यानंतर राजकीय घडामोडींना बुधवारपासून वेग आला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक घेतली. त्यानंतर सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर ज्या दिवशी हल्ला झाला त्यादिवशी म्हणजे २२ एप्रिलला श्रीनगरमधील नागरिकांनी एक मोठा कँडल मार्च काढत या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला. विमान कंपन्यांनी पर्यटकांना घरी पोहचवण्यासाठी अतिरिक्त विमानंही सोडली. तसंच या दरम्यान तिकिटांचे दर हे नियंत्रित ठेवले गेले आहेत.
दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा कठोर शिक्षा मिळणार-पंतप्रधान नरेंद्र मोदी
पहलगाम हे जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातलं गाव एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जातं. दरवर्षी इथे देशभरातून आणि परदेशातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. हे गाव आणि आसपासचा प्रदेश हिरवीगार कुरणं आणि सुंदर सरोवरांसाठी प्रसिद्ध आहे. इथला परिसर गर्द जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला आहे. त्यामुळेच अनेकजण पहलगामला भारताचं स्वित्झर्लंड असंही म्हणतात. काश्मीर मधल्या पर्यटनाच्या दृष्टीनं पहलगाम अत्यंत महत्त्वाचं आहे. याच पहलगामला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. या हल्ल्यात ज्यांना मारलं गेलं ते सगळे निष्पाप पर्यटक होते. संपूर्ण जगाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. तसंच भारतातही या हल्ल्याच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपलिकडची शिक्षा केली जाईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. आता पहलगाम या ठिकाणी झालेल्या या हल्ल्याचं प्रत्युत्तर भारत कसं देणार? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.