काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा निषेध नोंदवला जातो आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने झापलं आहे. अमेरिकेचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले.
काय म्हटलं आहे मायकल रुबिन यांनी?
“पाकिस्तान कधीही सुधरणार नाही. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि ओसामा बिन लादेन यांच्यात फक्त एकच फरक आहे की लादेन गुहेत रहात होता आणि मुनीर महालासारख्या बंगल्यात राहतो. पहलगाममध्ये जो हल्या पाकिस्तानने केला त्यानंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद पसरवणाऱ्या देशांच्या यादीत टाकलं पाहिजे. मुनीरला दहशतवादी असल्याचं घोषित करा.” अशी मागणी माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी केली आहे.
पहलगामचा हल्ला हमासप्रमाणेच आहे
पहलगाम मध्ये झालेला हा हल्ला दहशतवादी संघटना हमासने ऑक्टोबर २०२३ मध्ये केलेल्या हल्ल्यासारखा आहे. हा हल्ला यहुदींच्या विरोधात होता. आता जो हल्ला काश्मीरमध्ये झाला त्यात मध्यमवर्गीय हिंदूंना लक्ष्य करण्यात आलं. त्यावरुन पाकिस्तानची मानसिकता हमाससारखीच आहे हे दिसून येतं आहे. मायकल रुबिन यांनी पाकिस्तानची मानसिकता Lipstick on Pig सारखी आहे असंही म्हटलं आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आवळल्या पाकच्या मुसक्या
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिका भारतात प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर केंद्र सरकारने १९६० चा सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तानने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करणार नाही तोपर्यंत या करारावरील स्थगिती कामय राहणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
भारताचे निर्णय काय?
१९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येत आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील.
संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.
पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले व्हिसा रद्द मानले जातील. एसव्हीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडावा. यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत आहे.
नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा.
भारताने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.