Pahalgam Attack २२ एप्रिलला पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यांना धर्म विचारुन आणि गोळ्या झाडून ठार करण्यात आलं. या दहशतवाद्यांना पाकिस्तानचं पाठबळ होतं ही बाब समोर आली आहे. यानंतर आता SHO सह काही अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
कुणाकुणाची बदली करण्यात आली?
अब्दुल रशिद- अनंतनागचे डीपीएल यांची SHO म्हणून अशमुकामला बदली
निसार अहमद- अनंतनागहून SHO श्रीगुफवाराला बदली
पीर गुलजार अहमद-अनंतनागहून पहलगामला SHO म्हणून बदली
रियाझ अहमद यांची पहलगामहून DPL म्हणून अनंतनागला बदली
सैलेंद्र सिंग श्रीगुफवाराहून DPL म्हणून अनंतनागला बदली
परविझ अहमद अनंतनागहून कोकेनागला SHO म्हणून बदली
अशा सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर १३ दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.या बदलानंतर आता पीर गुलजार अहमद हे पहलगामचे SHO असतील. अनंतनाग या जिल्ह्यात एकूण पाच विभागीय पोलीस मुख्यालयं आणि ११ पोलीस ठाणी आहेत. पहलगाम, श्रीगुफवारा, अशमुकाम आणि बिजबेहरा सारखे भाग यात येतात. २२ एप्रिलला बैसरन या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या सीआरपीएफ अधिकाऱ्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे.

७ मे रोजी देशभरात मॉक ड्रीलचे आदेश
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानची चलबिचल झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच भारत सरकार या संदर्भात अनेक महत्वाच्या बैठका घेत आहे. यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना ७ मे रोजी नागरी संरक्षणासाठी ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला उत्तर देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची धास्ती वाढली आहे. भारत कधीही हल्ला करु शकतो अशी वक्तव्यं पाकिस्तानच्या नेत्यांकडून केली जात आहेत. दरम्यान पुढे नेमकं काय होतं? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे.