Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची चहुबाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर भारताकडून अनेक पावलं उचलले जात आहेत. एवढंच नाही तर अनेक पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मिडिया अकाउंट्सवर देखील भारतात बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे युट्यूब चॅनल देखील भारतात बंद करण्यात आले आहे.

यानंतर आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी मंत्री बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट देखील भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. दरम्यान, भारत सरकारने यापूर्वी माहिरा खान, हानिया आमिर आणि साजल अली अशा अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातलेली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला भारताने भारताविरुद्ध प्रक्षोभक, संवेदनशील सामग्री आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवरही बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शाहबाज शरीफ यांचं युट्यूब चॅनलही भारतात बंद

जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचंही युट्यूब चॅनल भारतात बंद करण्यात आलं आहे. त्यानंतर आज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी मंत्री बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट देखील भारतात ब्लॉक करण्यात आलं आहे, भारत सरकारने ही कारवाई केल्याची माहिती सांगितली जात आहे.