Pahalgam Terror Attack Mastermind Saifullah : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करून २५ जणांना ठार केलं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि संरक्षण दलाचे जवान सध्या या दहशतवाद्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे छायाचित्र व रेखाचित्र सुरक्षा यंत्रणांनी जारी केलं आहे. यापैकी तिघांची ओळख पटली असून आसिफ फौजी, सुलेमान शाह व अबू तल्हा अशी त्यांची नावं आहेत. दरम्यान, या कटामागील मूख्य सूत्रधाराची माहिती देखील समोर आली आहे.
लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्लाह खालिद याने पहलगामधील हल्ल्याचा कट रचल्याचं सांगण्यात आलं आहे. अद्याप संरक्षण दलातील कोणत्याही अधिकाऱ्याने या वृत्ताची पुष्टी केलेली नसली तरी अनेक प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने वृत्त प्रसिद्ध केलं आहे की ‘लष्कर’चा कमांडर व ‘दी रेजिस्टन्ट फ्रंट’च्या म्होरक्याचं नाव सैफुल्लाह कसुरी उर्फ खालीद उर्फ सैफुल्लाह साजिद जट्ट असं आहे. त्यानेच पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता.
हफीज सईदचा निकटवर्तीय
दोन पाकिस्तानी व पाकव्याप्त काश्मीरमधील दोन दहशतवाद्यांना हाताशी धरून सैफुल्लाहने त्याचा कट पूर्ण केला. त्यांच्या चौथ्या साथीदाराची ओळख अद्याप पटलेली नाही. काही माध्यमांनी दावा केला आहे की त्याचं नाव अबू मूसा असं आहे. मात्र, याची शासकीय स्तरावरून पुष्टी झालेली नाही. सैफुल्लाह हा कुख्यात दहशतवादी हफीज सईदचा निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातं. काही दिवसांपूर्वीच सैफुल्लाहने या हल्ल्याची योजना आखली होती. त्याच्या साथीदारांनी पहलगामधील पर्यटनस्थळाची आधी पाहणी देखील केली होती. त्यामुळेच चार दहशतवादी तिथे आले. त्यांनी बेछूट गोळीबार केला आणि ते तिथून सहज निसटले.
हल्ल्यात अबू मूसाचाही सहभाग?
फर्स्टपोस्टने म्हटलं आहे की सैफुल्लाहचा हा कट पूर्ण करण्यात त्याला अबू मूसाचं सहकार्य मिळालं. १८ एप्रिल रोजी रावलकोट येथे एक रॅली काढण्यात आली होती. त्या रॅलीत मूसा देखील होती. त्यावेळी त्याने तरुणांना चिथावणारं भाषण केलं होतं. तो म्हणाला होता की “जिहाद चालूच राहील. आपल्या बंदुका बोलतील. काश्मीरमध्ये मुंडकी छाटण्याचं काम चालूच राहील. भारत सरकार गैरकाश्मिरी लोकांना (असे लोक जे काश्मिरी नाहीत, स्थानिक नाहीत) इथलं रहिवासी प्रमाणपत्र देऊन काश्मीरचं लोकसंख्याशास्त्र बदलू पाहतोय. आपण त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ.”
सैफुल्लाह कसुरी कोण आहे?
सैफुल्लाह कसुरी हा लष्कर-ए-तैयबाच्या एका टोळीचा कमांडर आहे. तो बराच काळ पाकिस्तानमध्ये वास्तव्यास होता. तो अनेकदा पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांबरोबर दिसला आहे. पहलगाम हल्ल्याच्या दोन महिने आधी तो पाकिस्तानमधील कंगनपूरला गेला होता. तिथे पाकिस्तानी सैन्याची एक मोठी बटालियन तळ ठोकून आहे.