Pahalgam Terror Attack Updates Today: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत २६ पर्यंटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पहलगाम व आसपासच्या रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत. पहलगाममध्ये देशाच्या विविध भागातून पर्यटक सुट्ट्यांमध्ये इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आले होते. पण त्यांच्यावर आपल्या आप्तस्वकीयांना गमावण्याची दुर्दैवी वेळ ओढवली. महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिसा,कानपूर, केरळ अशा देशातल्या विविध भागांमधून हे पर्यटक पहलगाममध्ये आले होते. मृतांमध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या पर्यटकांचा समावेश आहे.

डोंबिवलीतील तीन ठार

नोकरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या तीन व्यक्तींचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. संजय लेले (४४), अतुल मोने (५२) व हेमंत जोशी अशी या तिघांची नावं आहेत. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेत अभियंता म्हणून कार्यरत होते, संजय लले डोंबिवली पश्चिममध्ये वास्तव्यास होते, तर हेमंत जोशी यांचं कुटुंबदेखील डोंबिवलीचंच असून त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

याव्यतिरिक्त कर्नाटकमधले एक रिअॅल्टर, ओडिशामधील अकाऊंटंट, कानपूरमधील व्यावसायिक, गल्फमधून नुकतेच परत आलेले केरळमधील एक रहिवासी अशा देशाच्या विविध भागातून पहलगाम येथे फिरायला गेलेल्या नागरिकांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

“आधी वाटलं की लष्कराचा सराव चालू आहे”

कर्नाटकच्या शिवमोग्गाचे रहिवासी मंजुनाथ राव (४७) यांचा दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी त्यांच्या डोक्यावर गोळी झाडली. त्यांच्यासह पत्नी पल्लवी राव व मुलगा अभिजेया हे दुपारच्या सुमारास बैसरणा खोऱ्याजवळ पोहोचले होते. त्याचवेळी तिथे दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. पल्लवी यांनी कुटुंबीयांना केलेल्या फोनकॉलमध्ये “आधी गोळीबार ऐकून लष्कराचाच सराव चालू आहे असं वाटलं”, असं सांगितलं. गोळीबार सुरू झाल्यानंतर १० मिनिटांत त्यांना मंजुनाथ यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला.

“मी तुला मारणार नाही, सांग मोदीला”

दरम्यान, पल्लवी राव यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं, “दहशतवादी साध्या कपड्यांमध्ये आले होते. माझ्या पतीला त्यांनी डोक्यात गोळी झाडली. मी दहशतवाद्याला म्हटलं की तू माझ्या पतीलाही मारलंय, मलाही मारून टाक. माझ्या मुलानंही त्याला हेच सांगितलं. पण तो म्हणाला मी तुला मारणार नाही, जाऊन सांग मोदीला”!

“काय घडलं ते आम्हाला कळलंच नाही”

ओडिशातल्या बालासोरच्या ४३ वर्षीय प्रशांत सतपतींच्या डोक्यात दहशतवाद्यांनी गोळी झाडली. ते पत्नी व नऊ वर्षांच्या मुलासमवेत पहलगाममध्ये आले होते. भुवनेश्वरमध्ये ते अकाऊंटंट म्हणून काम करत होते. त्यांच्या पत्नी प्रियदर्शिनी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की “माझ्या पतीला डोक्यात गोळी लागल्यानंतर आम्हाला कळलंच नाही की नेमकं घडलं काय. तिथे सगळीकडे खूप गोंधळ होता”.

मुलीनं वडिलांचा मृतदेह ओळखला…

केरळच्या कोचीमधील ६५ वर्षीय रामचंद्रन हे त्यांची पत्नी शीला, मुलगी अराथी आणि तिच्या दोन मुलांसमवेत पहलगाममध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले होते. “रामचंद्रन यांना घोडेस्वारी करत असताना गोळी लागली. नंतर त्यांची मुलगी अराथीनं स्थानिक रुग्णालयात त्यांचा मृतदेह ओळखला”, अशी माहिती कोचीतील त्यांच्या शेजारी जयालक्ष्मी यांनी दिली.

“…आणि शुभम जागीच ठार झाला”

कानपूरचे रहिवासी शुभम द्विवेदी (३१) हे त्यांच्या पत्नी ऐशन्या द्विवेदी व कुटुंबातील इतर ९ सदस्यांसह काश्मीर फिरण्यासाठी आले होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. “लग्नानंतरची ही त्यांची दुसरी ट्रिप होती. यावेळी त्यांनी कुटुंबासमवेत जायचं ठरवलं होतं. शुभम व त्यांच्या पत्नीने घोडेस्वारी करायचं ठरवलं होतं. पण त्याचवेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या शुभमचा जागीच मृत्यू झाला”, अशी माहिती शुभमचे चुलत भाऊ सौरभ द्विवेदी यांनी दिली.

छत्तीसगडमध्ये राहणारे दिनेश मिरानिया (४२) हे पत्नी नेहा व मुलांबरोबर काश्मीरमध्ये आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. पण त्यांचाही या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. “त्यांनी मला कालच फोन केला होता. ते म्हणाले की तै नुकचेच वैष्णोदेवीला दर्शन घेऊन आले होते. मंगळवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांचा मुलगाही या आनंदाच्या प्रसंगी त्यांच्यासोबत काश्मीरला आला होता”, अशी माहिती दिनेश मिरानिया यांच्या मित्रानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.