Pahalgam Terror Attack Adil Hussain : काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाही हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला आहे. चार दहशतवाद्यांनी बैसरनमध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता. यापैकी दोन दहशतवादी काश्मिरी, तर दोन जण पाकिस्तानी होते. त्यांना पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचं पाठबळ होतं. या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दीड वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केली होती. त्यांच्याबरोबर इतर काही घुसखोरही भारतीय हद्दीत घुसले होते. सीमेवरील सांबा-कथुआ भागात तारांचं कुंपण तोडून हे सर्व दहशतवादी भारतीय हद्दीत घुसले होते. तेव्हापासून भारतात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनंतनाग पोलिसांनी दोन्ही पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटवली असून अली भाई उर्फ तल्हा व हाशिम मूसा उर्फ सुलेमान अशी त्यांची नावं आहेत. पोलिसांनी या दोघांचे फोटो आणि रेखाचित्र जारी केलं आहे. तसेच यांचा लष्कर-ए-तैयबामधील कमांडर आदिल हुसैन थोकरचं रेखाचित्र देखील पोलिसांनी जारी केलं आहे. हा आदील हुसैनही पहलगामच्या कटात सहभागी होता असं एनआयएने म्हटलं आहे. या तीन दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास २० लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, अशी घोषणा जम्मू-काश्मीर पोलिसांनी केली आहे.

काश्मीरमध्ये शिक्षण, तिथेच नोकरी

आदिल हुसैन हा थोकर हा मूळचा अनंतनागमधील बिजबेहराचा रहिवासी आहे. शिक्षणासाठीचा व्हिसा घेऊन तो अटारी-वाघा सीमा पार करून पाकिस्तानला गेला होता. तिथे जाऊन तो पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात दाखल झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो दोन वर्षांपूर्वी तिकडच्या दोन साथीदारांना घेऊन भारतात आला होता. पाकिस्तानला जाण्यापूर्वी तो काश्मीरमधील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता.

आदील हुसैन याने खानाबाल येथील शासकीय महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. मास्टर्स करत असताना तो काश्मीरमधील एका शाळेत शिकवत होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या हाफीजने सांगितलं की “तो लोकांमध्ये फारसा मिसळायचा नाही, बऱ्याचदा तो केवळ अभ्यास करतानाच दिसायचा.”

दहशतवादी अनंतनागमध्ये लपल्याचा संशय

पहलगाममध्ये हल्ला करून फरार झालेले दहशतवादी अनंतनागमध्ये लपल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय रायफल्स व निमलष्करी दलाने स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली आहे.