१९९९ साली इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून एका प्रवाशाला भोसकून ठार मारणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी झहूर इब्राहिम याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बुधवारी पाकिस्तानच्या कराची शहरात गोळय़ा घालून हत्या केली. झहूर हा कराचीतील ‘उद्योजक’ असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. ‘अख्तर कॉलनी सेक्टर ए, गल्ली क्र. ४ जवळ झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती ठार झाली. त्याचा मृतदेह जिना रुग्णालयात हलवण्यात आला’, असे ‘चिप्पा’ या डिजिटल वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. उर्दूत वार्ताकन करणाऱ्या याच संस्थेने ‘बळीची’ ओळख झाहिद (४४) नावाने पटवली आहे. हा वैयक्तिक शत्रुत्वाचा प्रकार असल्याचे कराचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी म्हटल्याचेही तिने नमूद केले आहे. चार ते पाच लोक या उद्योजकाच्या दुकानात घुसले आणि त्यांनी चार ते पाच वेळा त्याच्यावर गोळीबार केला, असेही अधीक्षकांनी सांगितले. तथापि, ठार झालेला उद्योजक हा झहूर इब्राहिम होत आणि तो अनेक वर्षे झाहिद अखुंद या खोटय़ा नावाने राहात होता, असे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. १९९९च्या अपहरणात ‘डॉक्टर’ असे सांकेतिक नाव घेतलेला इब्राहिम हा कराचीतील अख्तर कॉलनीस्थित क्रिसेंट फर्निचरचा मालक होता. जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर याचा भाऊ रऊफ असगर हा झहूरच्या अंत्ययात्रेत सामील झाला होता, असे वृत्त आहे. रऊफ हा सध्या या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. पाच अपहरणकर्त्यांसह १७६ प्रवासी आणि १५ कर्मचारी असलेल्या इंडियन एअरलाइन्सच्या आयसी-८१४ या विमानाचे २४ डिसेंबर १९९९ रोजी नेपाळमधून अपहरण करण्यात आले होते. अमृतसर, लाहोर व दुबई येथे काही काळ थांबल्यानंतर हे विमान अखेर त्यावेळी तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानातील कंधार येथे उतरले होते. कोण होता झहूर? झहूर इब्राहिम हा पूर्वी हरकत-उल-मुजाहिदीन या संघटनेचा दहशतवादी होता आणि या विमानाच्या पाच अपहरणकर्त्यांपैकी तो एक होता. सध्या पाकिस्तानात राहणारे व ज्यांच्याविरुद्ध इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस प्रलंबित आहेत, ते मसूद अझहरचे भाऊ रऊफ असगर व इब्राहिम अझहर हेही अपहरणकर्त्यां पथकाचा भाग होते. या अपहरणकर्त्यांनी पत्नीसह काठमांडूहून परतत असलेल्या रुपिन कटय़ाल या २५ वर्षांच्या तरुणाची भोसकून हत्या केली होती. अपहरण नाटय़ाची अखेर.. मसूद अझहर, ओमर शेख व मुश्ताक अहमद झरगर यांची ३१ डिसेंबर १९९९ रोजी भारताच्या तुरुंगांतून सुटका करण्यात आल्यानंतर हे अपहरण नाटय़ संपले होते. प्रवाशांचे संपूर्ण आदानप्रदान त्या वेळी गुप्तवार्ता विभागाचे विशेष संचालक असलेले सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या देखरेखीखाली झाले होते.