Pakistan Drone Attack Updates: भारतानं पाकिस्तानमधील ९ ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानची आगळीक वाढली आहे. गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून भारताती काही लक्ष्य करून ड्रोन हल्ले करण्यात आले. मात्र, भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आणि भारतीय लष्कर पाकिस्तानच्या या कुरापतींसाठी सज्ज असल्यामुळे भारतानं ड्रोनचे हे हल्ले निष्प्रभ ठरवले. त्यानंतर भारताकडूनही पाकिस्तानमधील काही ठिकाणांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्यात आले. त्यामुळे सीमेच्या दोन्ही बाजूला काही भागांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आल्याचं दृश्य पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं गुरुवारी मध्यरात्री?
पाकिस्ताननं गुरुवारी आगळीक करत भारतीय लष्कराच्या काही ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारतानं पाकिस्तानचे हे हल्ले परतवून लावलेल. श्रीनगर, चंदीगड, भुज अशा ठिकाणांचा यात समावेश आहे. भारतीय परराष्ट्र विभागानं यासंदर्भात दुपारी निवेदन जारी करून माहितीही दिली. त्यानंतर सीमेच्या दोन्ही बाजूला काही ठिकाणी ब्लॅकआऊट पाहायला मिळाला. त्यानंतर संध्याकाळी उशीरा पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ (LOC) करण्यात आलेल्या गोळीबारालाही भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं.
भारतानं पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला. त्यानंतर पाकिस्ताननं भारतातील १५ शहरांना लक्ष्य करून मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला. भारतानं हे मिसाईल हवेतच उद्ध्वस्त करून पाकिस्तानचा मनसुबा पूर्ण होऊ दिला नाही. मात्र, रात्रभर सीमेपलीकडून पाकिस्तानी लष्कर सातत्याने गोळीबार करत होतं.
जम्मू-काश्मीरच्या दिशेनं पाकिस्तानचे ८ मिसाईल!
८ मे रोजी पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमधील एकूण ८ ठिकाणांना लक्ष्य करत मिसाईल डागले होते. यात सतवारी, सांबा, आर. एस. पुरा आणि अर्णिया या ठिकाणांचाही समावेश होता. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे मिसाईल वेळीच शोधून ते हवेतच उद्ध्वस्त केले. भारतीय हवाई दलानं यासाटी भारताची इंटीग्रेटेड काऊंटर यूएएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टीम लाँच केली आहे. त्यात शत्रूच्या मिसाईल्सचा अचूक लक्ष्यभेद करणारी S 400 सुदर्शन ही यंत्रणा आहे. शिवाय बराक ८ एमआरएसएएम आणि भारतीय बनावटीच्या आकाश यंत्रणेचाही यात समावेश होता. यातून भारताच्या हवाई हद्दीला पूर्ण संरक्षित करण्यात भारतीय हवाई दलाला यश आलं.
सुरक्षेचा उपाय म्हणून ब्लॅकआऊट
जम्मूमध्ये गुरुवारी संध्याकाळी पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आला होता. काही प्रत्यक्षदर्शींनी ड्रोन आणि मिसाईल देखील पाहिल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. काही भागात पाकिस्तानचे हे मिसाईल पाडल्याचे मोठे आवाजही स्थानिकांनी ऐकले.पाकिस्तानकडून जम्मू विमानतळाला लक्ष्य करण्यात आलं होतं, अशी माहिती आता समोर आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जम्मू पोलिसांनी स्थानिकांना ब्लॅकआऊटच्या काळात सर्व प्रकारचे दिवे बंद ठेवण्याचं आणि घरातच राहण्याचं आवाहन केलं. आवश्यकता नसताना गाडीने प्रवास नका, असेही निर्देश जारी करण्यात आले.
अखनूर, राजौरी, पूंछमध्ये ड्रोन हल्ले
दरम्यान, याचवेळी पाकिस्तानकडून जम्मूच्या अखनूर, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील काही ठिकाणांना लक्ष्य करून ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. एकीकडे भारतीय हवाई दलाकडून हे हल्ले परतवून लावले जात असताना दुसरीकडे श्रीनगर विमानतळावर हाय अलर्ट देण्यात आला होता. विमानतळ सुरक्षा व्यवस्था अॅक्टिव्हेट करण्यात आली होती. श्रीनगरमध्येही रात्री १० च्या सुमारास ब्लॅकआऊट करण्यात आला.
पंजाबमध्येही सायरन आणि ब्लॅकआऊट
दरम्यान, पंजाब आणि राजस्थानच्याही सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआऊट आणि सायरन अलर्ट देण्यात आले होते. पंजाबमध्ये अमृतसर, जलंधर, गुरदासपूर, तर्न तरन, होशियारपूर, पठाणकोट, फिरोझपूर, फझिलका आणि चंदीगड या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या. तर मोहाली आणि बाजूच्या पंचकुलामध्येही ब्लॅकआऊट करण्यात आला होता. गुजरातमध्येही कच्छ आणि आसपासच्या भागात ब्लॅकआऊट करण्यात आला होता.
रात्री ९ च्या सुमारास राजस्थानमध्ये ड्रोन
राजस्थानमध्ये जैसलमेर आणि बिकानेरमध्ये अनेक स्थानिकांनी आकाशात ड्रोन आणि मिसाईल्स पाहिल्याचा दावा केला. या भागातही भारतीय हवाई दलाच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल हवेतच उद्ध्वस्त केले. राजस्थानमध्ये रात्री ९ च्या सुमारास पाकिस्तानचे ड्रोन दिसायला सुरुवात झाली. “हे पाकिस्तानचे ड्रोन होते. त्यांचा माग घेऊन ते यशस्वीरीत्या उद्ध्वस्त करण्यात आले आहेत”, अशी माहिती एका बीएएसएफ अधिकाऱ्याने दिली. यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. राजस्थानमधले हे ड्रोन हल्ले रात्री ११ पर्यंत चालू होते. सीमेवरच्या भागात पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आला होता, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा
दरम्यान, गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सीआरपीएफ, बीएसएफ आणि एसएसबी या दलांच्या महासंचालकांशी चर्चा केली. “सीमाभागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शाह यांनी या उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना स्थानिक पोलीस व प्रशासनाला कोणतीही आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व मदत करण्याचे आदेशही दिले आहेत. अमित शाह यांनी सीआयएसएफच्या प्रमुखांशीही चर्चा केली असून या भागांमधील विमानतळांवरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला”, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली.