काश्मीरमधील जनतेवर भारत सरकार अत्याचार करत असल्याची सतत गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला आता तेथील जनताच आरसा दाखवण्याचं काम करतेय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाचे माजी आमदार बलदेव कुमार सिंह हे पाकिस्तान सोडून भारतात आले आहेत. पंजाबमध्ये आल्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजकीय आश्रयस्थान द्यावं अशी विनंती केली आहे. 43 वर्षीय बलदेव कुमार यांनी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याचं म्हटलं आहे. "केवळ अल्पसंख्यांकच नव्हे तर मुस्लीम देखील पाकिस्तानात सुरक्षित नाहीयेत. बऱ्याच अडचणींना तोंड देत आम्ही पाकिस्तानात जगतोय. मी परत जाणार नाही. भारत सरकारने पाकिस्तानातील हिंदू आणि शीख कुटुंबीयांसाठी एखादं पॅकेज जाहीर करावं, जेणेकरुन ते पाकिस्तानातून भारतात परततील. मोदींनी त्यांच्यासाठी काहीतरी करावं.त्यांच्यावर तेथे प्रचंड अत्याचार होत आहेत", अशी मागणी बलदेव यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना केली आहे. Baldev Kumar, former MLA of Pakistan PM Imran Khan's Pakistan Tehreek-i-Insaf (PTI): Indian Govt should announce a package so that the Hindu and Sikh families staying in Pakistan can come here. I want Modi Sahab do something for them. They are tortured there. — ANI (@ANI) September 10, 2019 बलदेव कुमार सिंह हे सध्या तीन महिन्यांच्या व्हिसावर भारतात आले आहेत. स्वतः भारतात दाखल होण्यापूर्वीच बलदेव यांनी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांना लुधियानातील त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. "इम्रान खान यांनी दिलेलं एकही वचन पूर्ण केलं नाही. हिंदू-शीख सोडूनच द्या त्यांनी मुस्लिमांसाठीही काहीच केलं नाही. पाकिस्तानात सध्या सगळे त्रस्त आहेत", असंही ते पुढे म्हणाले.